श्रीनगर येथील एका सफारी दुकानाचे शट्टर उचकटून 26 लाख रुपयांचे दागिने असणारी तिजोरी पळविण्यात आली आहे. बुधवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे
प्रतिनिधी / बेळगाव
श्रीनगर येथील कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्री राघवेंद्र ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. सराफी दुकानाचे शट्टर उचकटून चोरटय़ांनी सहजासहजी न उचलणारी तिजोरीच पळविली आहे. या तिजोरीत 20 किलो चांदी व 250 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. या संबंधी राघवेंद्र दैवज्ञ यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार राघवेंद्र दैवज्ञ हे रोज रात्री 9 वाजता आपले सराफी दुकान बंद करतात. मंगळवारी अर्धातास आधी 8.30 वाजता दुकान बंद करुन ते घरी गेले होते. बुधवारी होणाऱया क्रिकेट सामन्यासाठी मंगळवारी रात्री आपण अर्धातास लवकर दुकान बंद केले होते. त्यानंतर बुधवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आपण माळमारुती पोलिसांना ही घटना कळविल्याचे राघवेंद्र दैवज्ञ यांनी सांगितले.
सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त अवस्थेत
या सराफी दुकानातील एक सीसीटीव्ही कॅमेरा नादुरुस्त अवस्थेत आहे. सुरू असलेल्या कॅमेऱयाची वायर कापण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील अन्य कॅमेऱयात चोरटय़ांची छबी कैद झाली आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे. एकंदर प्रकार लक्षात घेता चोरटय़ांची संख्या किमान 8 ते 10 असल्याचा संशय आहे.
आठ जणांनी ठेवली होती तिजोरी
चोरटय़ांनी पळविलेली तिजोरी सुमारे अडीच फूट उंच आहे. त्याचे वजनही अधिक आहे. तीन वर्षांपूर्वी सराफी दुकान सुरू करताना राघवेंद्र दैवज्ञ यांनी ही तिजोरी मागविली होती. ती उचलून ठेवण्यासाठी सात ते आठ जण लागले होते. चोरटय़ांनी अशी तिजोरी सहजासहजी कशी पळविली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तिजोरीसाठी शोध
अनेक चोरी प्रकरणांत ऐवज काढून घेवून तिजोरी इतरत्र फेकून दिल्याची उदाहरणे पहायला मिळतात. या प्रकरणातही चोरटय़ांनी कोठे तरी तिजोरी फेकून दिली आहे का? यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र बुधवारी रात्रीपर्यंत तिजोरी सापडली नाही. मध्यरात्री या परिसरात रहदारी असते. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच हे दुकान आहे. तिजोरी पळविण्यासाठी कोणत्या वाहनांचा
वापर करण्यात आला, याचाही तपास करण्यात येत आहे.