सिंधुदुर्गात चक्क मे महिन्यात धुक्याची चादर
मोसमातील बदल कारणीभूत
चिंतेचे कारण नाही-डॉ. यशवंत मुठाळ
भाग्यविधाता वारंग / झाराप:
धुके पडले, म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला, असे मानले जाते. मात्र, आता तर ‘मे’ महिन्यातील कडक उन्हाळा सुरू आहे. पावसाळा अजून सुरू व्हायचा आहे. हिवाळा सुरू होणे अजून खूपच लांबची गोष्ट आहे. असे असले, तरी जिल्हय़ात काही ठिकाणी शनिवारची सकाळ उजाडली तीच जणू दाट धुक्मयाची शाल पांघरुनच. जिल्हय़ात पडलेले हे धुके मौसमी फरकांमुळे पडले असून त्यामुळे चिंतेचे कारण नाही, असे मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. यशवंत मुठाळ यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारी पहाटेपासूनच जिल्हय़ात काही ठिकाणी हिवाळय़ासारखे दाट धुके पडले. त्यामुळे या घटनेने आश्चर्य व्यक्त होत राहिले. निसर्गातील बदलामुळे हे धुके उद्भवले. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे निर्माण झालेले ‘तौक्ते’ चक्रीवादळ व त्यानंतर पडलेला पाऊस आदी वातावरणीय बदल यासाठी कारणीभूत ठरले.
कसे तयार होते धुके
हवा व दवबिंदू या दरम्यानच्या तापमानाचा फरक 2.5 अंश सग्नेल्सिअस अथवा चार अंश फॅरन हाईटपेक्षा कमी असल्यास धुक्मयाची निर्मिती होते. धुके ही एक वातावरणीय घटना आहे. यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्तरित ढग तयार होतात. यात पाण्याचे सर्वांत लहान थेंब असतात. जेव्हा वातावरणात पाण्याची वाफ मोठय़ा प्रमाणावर तयार होते तेव्हा धुके ही नैसर्गिक घटना उद्भवते.
हिवाळय़ात धुके जास्त असते. कारण हिवाळय़ात थंडी असते. त्याचबरोबर पृथ्वी काही प्रमाणात सामान्य तापमान राखते. यामुळे उष्णता पसरते व धुके निर्माण होते. तापमान कमी होणे (शीतलीकरण) आणि हवेत बाष्प शिरणे (बाष्पीभवन) या दोन क्रिया महत्वाच्या ठरतात. ज्यावेळी जी परिस्थिती धुके निर्माण होण्यास कारणीभूत असते, त्यानुसार धुक्मयाचे प्रकार पडतात.
पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन हवा संपृक्त झाल्यासही दवाच्या रुपात धुके पडते. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील उष्णता जसजशी वाढायला लागते, त्यानुसार धुक्मयाची तीव्रता कमी होते. म्हणून आपणास सकाळीच जास्त धुके दिसते.
असे आहेत धुक्मयाचे प्रकार
धुक्मयाचे विविध प्रकार आहेत. शीतलीकरण धुके, बाष्पीभवन धुके, प्रारणजन्य धुके, अभिवहन धुके, वर्षाजन्य धुके, आरोही धुके. धुके हे अभिवहन, प्रारण, हवेची आरोही गती, पर्जन्यवृष्टी, बाष्पीभवन आदी क्रिया-प्रक्रियांच्या संयोगामुळे घडून येतात. भूपृष्ठावरील धुकी ही बहुतांशी प्रारणजन्य असतात. सिंधुदुर्गातील अवकाळी धुके हे प्रारणजन्य प्रकारातील आहे.
धुके एकजिन्सी नाही
धुके एकसारखे सगळीकडेच असेल, असे नाही. धुके हे नेहमीच एकजिन्सी, एकसंघ व विस्तृत क्षेत्रात व्यापलेले असेलच, असे नाही. त्यामुळे काही भागात दाट धुके, तर जवळच्या ठिकाणी धुक्मयाचा लवलेशही पाहायला मिळत नाही.
सिंधुदुर्गातील आताचे धुके हे प्रारणजन्य-डॉ. यशवंत मुठाळ
सिंधुदुर्ग जिल्हय़ात या ‘मे’ महिन्यात विक्रमी म्हणजे 450 ते 500 मि.मी. एवढा पाऊस पडला आहे. गेल्या तीसेक वर्षांत एवढा पाऊस झाला नाही. मे महिन्यातला सरासरी पाऊस हा दहा ते पंधरा मिमी. एवढा असतो. मौसमी बदलामुळे ‘प्रारणजन्य’ धुके सिंधुदुर्गात पडले आहे. हवामानातील बदल हा सकारात्मकही आहे. हवेतील आद्रता ही 90 ते 60 टक्केच्या दरम्यान आहे. यामुळे आंब्यातील ‘साका’ निर्माण होण्याचे प्रमाण कमी होईल. मात्र, फळ कुजीचे प्रमाण वाढणार आहे, असे मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे डॉ. यशवंत मुठाळ यांनी सांगितले.
कसे उद्भवते प्रारणजन्य धुके
पावसामुळे व ओल्या जमिनीतून झालेल्या बाष्पीभवनामुळे भूपृष्ठाजवळच्या हवेच्या थरात भरपूर जलबाष्प शिरले असेल, तर रात्रीच्या प्रारणामुळे प्रारणजन्य धुके निर्माण होते. निसर्गात वेगवेगळे बदल होत आहेत. एकूणच मानवाने निसर्गाशी मैत्री राखत, निसर्ग नियम पाळणे महत्वाचे ठरणार आहे एवढे मात्र निश्चित.