प्रतिनिधी/ निपाणी
गेल्या काही दिवसात हवेतील गारवा कमी होत चालला असताना अचानक तीन दिवसांपासून हवेत दाट धुके दिसून येत आहे. दरम्यान दाट धुके अन् वाढत्या थंडीमुळे निपाणीसह ग्रामीण भाग गारठला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचा परिणाम पहाटेच्या वेळेस वाहतुकीसह अन्य कामांवर होत आहे. निपाणीत तर शनिवारी सकाळी दाट धुक्यांमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ हेस्कॉमवर आल्याचा प्रकार घडला.
गुरुवारी व शुक्रवारी पहाटे हवेत अक्षरशः धुक्याचा पाऊस पडल्याचे पहायला मिळाले. या धुक्यामुळे पहाटे वैरणीसाठी जाणारे शेतकरी कामावर जाणारे कर्मचारी तसेच अन्य वाहनधारकांसाठी अडचणी येत असल्याचे दिसत आहे. धुक्यातून वाट शोधताना धुक्याचा मारा सहन करावा लागत असल्याने आजारांचे प्रमाणही वाढत आहे. शनिवारी पहाटे तर दाट अशा धुक्यामुळे हेस्कॉमने खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे तीन तास वीजपुरवठा केला होता. दाट धुक्यातून पाण्याचा मारा होत असल्याने उपकेंद्रांमध्ये कंडक्टर खराब होऊ नये यासाठी वीज खंडित करण्यात आला होता.
पिकांना फटका, शेतकरी चिंतेत
पट्टणकुडी : दाट धुक्मयामुळे पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी 9 पर्यंत हे धुके असल्याने रस्त्यावर दहा फुटासमोरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना मोठय़ा सावधानतेने वाहन चालवावे लागत होते. सध्या परिसरातील शिवारामध्ये शाळू, मका, हरभरा, तंबाखू ऊस, आदी पिकांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र या धुक्मयामुळे शाळू व तंबाखू या पिकाला धोका निर्माण झाला होता. या परिसरात सध्या तंबाखू पिकाची कापणी सुरु आहे. तंबाखू वाळविण्यासाठी तंबाखूचे चाप टाकण्यात येत आहे. मात्र या धुक्मयामुळे तंबाखूच्या पानावर लाल रंग पसरतो आणि तंबाखूचा दर्जा घसरतो परिणामी वजनातही घट होते. तर शाळूच्या कणसाची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
आरोग्यावर परिणाम
कारदगा : कारदगा, बारवाड, मांगूर, ढोणेवाडी, माणकापूर, भोज, भोजवाडी आदी परिसरात गेल्या चार दिवसांपासून दाट धुके पडत आहे. या धुक्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या पहाटेपासून जे धुके सुरू होते. ते सकाळी 10 पर्यंत राहते. या दाट धुक्यामुळे सकाळी कामावर जाणाऱया लोकांना फारच अडचणीचे होत आहे. धुक्यामुळ दिवे लावूनच वाहनधारकांना वाट शोधावी लागत आहे. तसेच धुक्यामुळे सर्दी, खोकला, थंडी, तापाच्या साथीचा फैलाव होत आहे. यापासून बचाव करण्यासाठी स्वेटर, मफलेर, कानटोपी, हातमौजे आदींचा वापर करावा लागत आहे.