ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यातच मुंबईत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर ही मुंबईत जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते आहे.
शुक्रवारी सकाळी दादरमधील भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी नागरिकांनी मास्क देखील घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करताना दिसत नव्हते. एकीकडे पालिकेकडून देखील कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.
दरम्यान, काल मुंबईमध्ये कोरोनाचे तब्बल 8,938 नवे रुग्ण आढळून आले. तर 23 जणांचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत 86 हजार 279 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 32 लाख 29 हजार 547 वर पोहचली आहे. तर सद्य स्थितीत राज्यात 5 लाख 21 हजार 317 रुग्ण उपचार घेत आहेत. एवढी भयानक परिस्थिती असून देखील मुंबईकर नियमांचे पालन करताना दिसत नाही आहेत. यावर आता मुंबई महापालिका काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.