राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची टिका
कोल्हापूर प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार 10 मार्चला कोसळेल असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. मात्र अद्यापही महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. चंद्रकांत दादांनी आत्तापर्यंत खूप तारखा दिल्या आहेत. आता एकच तारीख द्यावी असा टोला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगावला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शनिवारी कोल्हापर दौऱ्यावर आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सर्व घटकांना सोबत घेवून बजेट सादर केले. महिला समाधानी आहेत. कोरोना काळात ज्यांचा आधार गेला त्यांचे पालकत्व त्यांचे शिक्षण आणि त्यापुढील जबाबदारी घेण्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली असल्याचे अध्यक्षा चाकणकर यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांनी कोणताही पुरावा जवळ नसताना केवळ आरोप करणे हा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी राबविला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना कोणत्याही नोटीसीशिवाय कारवाई केली. स्वतःची बाजू मांडण्याची संधी दिली नाही. विरोधकांना साम, दाम, दंड भेद वापरुन त्यापद्धतीने सरकारवर टिका करायची आहे. दोन वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना काळात महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेला जपण्याचे त्यांचे पालकत्व घेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. विरोधकांकडे आता कोणताही विषय नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करण्याचे काम करत असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.
म्हणूनच दादांना महिलेचा सुरक्षित मतदार संघ घ्यावा लागला.
चंद्रकांत दादा केवळ तारखांवर तारखा देत आहेत. कोल्हापूरातील मतदारारांनाही केवळ त्यांनी तारखाच दिल्या आहेत. त्यामुळे दादांना पुणे येथे एका महिलेच्या सुरक्षित मतदार संघाचा आधार घ्यावा लागला आहे. अशी टिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली. दादांनी खूप तारखा दिल्या आहेत आता कोणती तरी एक तारीख दादांनी सांगावी असे आवाहनही त्यांनी केले.