इन्फोसिसच्या पद्मश्री सुधा मूर्ती यांचे मत
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतेही दान परतफेडीच्या अपेक्षेने करू नये, अन्यथा ते दान सत्पात्री ठरत नाही. दान किंवा मदत ही केवळ पैशाच्या स्वरुपातच केली पाहिजे असे नव्हे तर दुसऱयाच्या वेदनेची जाणीव ठेऊन त्याला दिलासा देणे हीसुद्धा मोठी मदत आहे, असे विचार इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री सुधा मूर्ती यांनी व्यक्त केले.
बेळगावच्या दि इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनियर्सच्यावतीने रविवार दि. 4 रोजी ‘गरजुंना मदत हेच दान’ या विषयावर वेबिनार पार पडले. या वेबिनारमध्ये सुधा मूर्ती यांनी बीजभाषण करताना हे मत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, दान करताना अहंकाराची भावना असू नये. दान केल्याने आपल्याला आनंद मिळायला हवा. किती दान केले हे महत्त्वाचे नाही तर त्यामुळे किती जणांना उपयोग झाला हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही दानातून परतफेडीची कसलीही अपेक्षा असू नये.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी स्वागत करून वक्त्यांची ओळख करून दिली. या वेबिनारमध्ये व्ही. बी. जावूर, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. एच. बी. राजशेखर, प्रा. प्रकाश पट्टणशेट्टी, डॉ. सुरेश नाडगौडा, प्रा. अरविंद गलगली यांच्यासह परदेशातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. संस्थेचे सचिव बी. जी. धरणी यांनी आभार मानले. या वेबिनारला प्रा. मंजुनाथ शरणप्पण्णवर व प्रा. प्रमोद अल्लापण्णवर यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.