थंडी आणखी वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी/ रत्नागिरी, मौजे दापोली
शहरामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच रत्नागिरीमध्ये वाऱयाचा वेग कमी होण्याची शक्यता असून आर्द्रतेमध्ये जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते, अशी शक्यता स्काय मेट या संकेतस्थळाने वर्तवली आहे. दरम्यान दापोलीचे तापमान 10 अंश सेल्सिअस असल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.
आठवडाभरात तापमान कमाल 38 अंश व किमान 21 अंश सेल्सिअसवरून कमाल 31 अंश व किमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तसेच आर्द्रता 46 टक्क्यांवरून तब्बल 92 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाऱयाचा वेग 20 किमी प्रति तासांवरून 16 किमी प्रतितासांवर येऊन ठेपणार आहे. वातावरणातील अनुकूल बदलांमुळे गेल्या आठवडय़ात थंडी लागत होती, परंतु गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका ओसरायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळनंतर गारठा वाढत जाऊन पहाटे कडाक्याची थंडी जाणवत आहे. किमान तापमान कमी असले तरी गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान वाढायला लागले आहे. शहरात मंगळवारी 21 अंश सेल्सिअस किमान आणि 38 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले. गार वाऱयाचाही जोर ओसरल्याने दिवसा थंडी वाजली नाही.
दापोलीकर गारठले
गेले काही दिवस पाऱयात घसरण होऊन थंडीने दापोलीकरांना चांगलेच गारठवले आहे. दापोलीचे तापमान 10 अंश सेल्सिअस असल्याचे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून कळवण्यात आले.
दापोलीचे तापमान गेले काही दिवस 12.4, 11.9, 11 वरून सोमवारी 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याने दापोलीकरांना हुडहुडी भरली. वाऱयाचा वेग वाढल्यामुळे तसेच हिमालयाकडून गार वारे वाहत असल्यामुळे मिनी महाबळेश्वर संबोधल्या जाणाऱया दापोलातील नागरिकांना थंडीचा आनंद घेता येत आहे. या थंडीमुळे आंबा, काजू बागायतदारही सुखावले आहेत. सोमवारी दापोलीचे कमाल तापमान 33.7 अंश व किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. सापेक्ष आर्द्रता सकाळी 88 टक्के तर दुपारी 52 टक्के नोंदवण्यात आली आहे. गेल्यावर्षी या तारखेस कमाल तापमान 29 अंश व किमान तापमान 13 अंश सेल्सिअस होते, असेही विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.