गैरसमजातून सहा महिन्यांपासून हॉटेलमध्ये बंद
मनोज पवार/ दापोली
दापोलीतील दाऊद जीवरक व अहमद वाकणकर यांच्यासह 20 जण केवळ गैरसमजामुळे गेले सहा महिने येमेन देशाच्या कैदेत अडकून पडले आहेत. आपल्या सुटकेसाठी विविध दरवाजे ठोठावूनही त्यांना यश आलेले नाही. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली आहे.
याबाबत दापोलीतील दाऊद जीवरक यांच्या पत्नी शबनम यांनी सांगितले की, दाऊद (45) व अहमद वाकणकर (45), रत्नागिरी शहरातील अन्य एकासह 20 जण सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी जात होते. त्यांना आरती शिपिंग या भारतीय एजन्सीने तेथे नोकरीसाठी पाठवले होते. जीवरक हे दापोलीतील उसी पार्क येथील व वाकणकर अडखळ येथील रहिवासी आहेत. 28 जानेवारी रोजी ते सौदी अरेबियात नोकरीसाठी दापोलीतून मुंबईला गेले. 1 फेब्रुवारीला ते विमानाने ओमानमध्ये व तेथून पुढे बोटीतून सौदी अरेबियाला निघाले.
येमेनजवळ त्यांच्या नौकेच्या इंजिनमध्ये लिकेज झाल्याने बोटीत पाणी भरले व नौका बुडाली. त्यांच्या सोबत असणाऱया अन्य दोन बोटीतील ग्रुप मेंबर्सनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्यांना आपल्या बोटीत घेतले. मात्र, हवामान व वादळी स्थितीमुळे या नौकांनी तेथेच काही अंतराव नांगर टाकला. त्यांनी आश्रयासाठी नांगर टाकला ती जागा नेमकी येमेनची युद्धभूमी होती. मात्र याची कोणतीही कल्पना नौका चालकांना अथवा प्रवाशांना नव्हती. आपल्या युद्धभुमीत उभ्या असलेल्या या जहाजावरील लोक हे शत्रू असल्याचे समजून या सर्वांना दुसऱया दिवशी येमेनच्या सैनिकांनी अटक केली. यानंतर त्यांना 17 फेब्रुवारी रोजी येमेनमधील एका अज्ञात हॉटेलच्या खोलीत बंद करून ठेवण्यात आले. यावेळी त्यांच्याकडील मोबाईलदेखील काढून घेण्यात आले. यामुळे त्यांचा जगाशी संपर्क तुटला.
काही दिवसांपूर्वी अटकेत असलेल्या या लोकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी सर्वांनी आपापल्या घरी संपर्क साधला. यानंतर आरती शिपिंग कंपनी, भारतीय दुतावास, डीजी शिपिंग, मुंबईतील विदेश भवन, राष्ट्रीय मानव अधिकार यांचेही दरवाजे ठोठावले. मात्र त्यांना कोणाताही दिलासा मिळाला नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सहा महिन्यांपूर्वी अटक करताना त्यांच्याकडून ताब्यात घेतलेली त्यांची कागदपत्रेही अद्याप परत करण्यात आलेली नाहीत. शिवाय या काळात कंपनीने पगारदेखील न दिल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या सर्व प्रकरणात दीर्घ काळ गेल्याने त्यांच्या नातेवाईकांचा संयम सुटत चालला आहे. त्याचवेळी येमेनच्या ताब्यातील हे सर्वजण घाबरले आहेत. जीविताला धोका उत्पन्न होण्यापूर्वी त्यांची सुटका व्हावी, अशी मागणी त्यांचे नातेवाईक करत आहेत.
सुटकेचा फोन, मात्र आजही कैदेतच
सुमारे तीन महिन्यांपुर्वी येमेनेमधील भारतीय दूतावासातून दापोलीतील एका कैद्याला फोन आला होता. यामध्ये येमेन सरकारने त्यांची सुटका केली असल्याची माहिती त्यांना दिली होती. मात्र विमानसेवा सुरू नसल्याने त्यांना मायदेशी परतणे शक्य नसल्याचे कळवले होते. मात्र तीन महिने उलटूनही सुटकेबाबत पुढे कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे अजूनही हे सर्वजण कैदेतच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.