समुद्रातून मासळी गायब, मिळणाऱया मच्छीचे दर वाढले!
वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यात मच्छीची आवक घटली आहे. यामुळे मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. दापोली मच्छी मार्केटमध्ये म्हाकूळ, सुरमई, पापलेट, कोळंबी आदी चविष्ट माशांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस, वादळसदृष्य स्थिती या कालावधीपासून बंदरामध्ये मासळीच मिळत नसल्याचे हर्णै बंदरातील मच्छीमारांकडून सांगण्यात आले. दापोली तालुका हा पर्यटन क्षेत्र असल्याने पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीची मोठी मागणी होत आहे. त्याचबरोबर पर्यटक स्वत: बंदरात जाऊन लिलावात मासळी खरेदी करत आहेत. या लिलावात किलो वर मच्छी विकली जात असून मासळीने भरलेला कॅरेट 13 ते 14 हजारांवर विकला जात आहे. मात्र सध्या समुद्रातूनच मासळी गायब झाल्याने अनेक मच्छीमारांना मासळी कशी पुरवायची व कर्मचाऱयांचे पगार कसे काढायचे, असा प्रश्न पडला आहे. किरकोळ मासळी मिळत असल्याने मासळीच्या दरात वाढ झाली आहे.
सध्या दिवसभर फिरून किरकोळ प्रमाणात म्हाकूळ, सुरमई, पापलेट, कोळंबी असे मासे मिळत आहेत. मात्र तेही अपुरे पडत आहेत. दापोलीत मासळीची मोठी मागणी आहे, परंतु मासळीच नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे मुंबईला मासळी पाठवणे बंद करण्यात आले आहे. हर्णै बंदरातून जवळपास 35 ते 40 टक्केच नौका मासेमारी करत आहेत. त्यामुळे मोठय़ा मासळीचे दर वाढल्याचे समोर आले आहे. त्यात आता नाताळ सण आल्याने सलग सुट्टय़ा लागून आल्या आहेत. त्याचबरोबर थर्टीफस्ट आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मासळीची मागणी आहे. त्यात डिझेलचे दरदेखील गगनाला भिडले आहेत. अशा अनेक अडचणी मच्छीमारांसमोर आहेत. त्यात मासळीची आवक घटल्यामुळे मासळी चढय़ा भावाने विकली जात असल्याचे मच्छीविक्रेत्यांकडून सांगण्यात आले.