प्रतिनिधी / दापोली
बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरीतिल दापोली तालुक्यातील अनेक रस्ते झाडे पडल्याने बंद झालेले आहेत. हे रस्ते मोकळे करण्याचे काम शुक्रवारी तिसर्या दिवशी देखील एनडीआरएफ व महसूल विभागाकडून युद्धपातळीवर सुरू होते. हे रस्ते मोकळे करण्यासाठी एन डी आर एफ ची 19 जणांची टीम ताराचंद डोगरा यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथून येऊन दापोलीत काम करत आहे.
हे रस्ते तातडीने वाहतुकीकरिता सुरळीत व्हावेत याकरिता महसूल विभागाकडून प्रत्येक मंडल अधिकाऱ्याला पेट्रोलवर चालणारे नवीन कटर मशीन विकत घेऊन देण्यात आले आहे. हे मशीन चालवण्याचे प्रशिक्षण देखील गुरुवारी सायंकाळी तहसील कार्यालयात पार पडले. शुक्रवारी रात्रीपर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते मोकळे होतील व वाहतूक सुरू होऊन पंचनाम्यांच्या कामाला गती येईल अशी आशा दापोलीचे तहसीलदार समीर घारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत दापोलीचे गटविकास अधिकारी श्री. राऊत व नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी महादेव रोडगे उपस्थित होते.
तसेच पाजपंढरी येथे 2 व्यक्ती वादळीवाऱ्यामध्ये अंगावर चिरे पडून जखमी झाल्या आहेत. मौजे आगरवायंगणी येथील एका बैलाचा मृत्यू झाला आहे. मौजे आंजर्ले येथे राजेश बोरकर यांच्या वादळीवाऱ्याने 1 गाय मयत झाली आहे. मौजे आंजर्ले येथे मंगेश महाडीक यांच्या वादळीवाऱ्याने 48 कोंबड्या मयत झाल्या आहेत अशी नोंद महसूल खात्याकडे करण्यात आली आहे. दापोली तालुक्यात एकूण किती नुकसान झालेली आहे हे कळण्यासाठी आणखीन दोन दिवस लागतील अशी माहिती समीर घारे यांनी यावेळी बोलताना दिली.