दापोली/प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यावर अनेक तक्रारी विनंत्या करून देखील काही फरक पडत नसल्याने मनसेच्यावतीने चिखलणी व लावणी असे अनोखे आंदोलन करण्यात आले.
दापोली शहर व मुख्य रस्त्यांची अवस्था थोडी बरी आहे. मात्र दापोली तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: खड्डे पडून चाळण झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी चिखल उडुन वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. तर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. अथवा चिखलात माखत आहेत यावर ग्रामस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला मात्र याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. अखेर दापोली मनसेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या खड्ड्यांमध्ये चिखलणी व लावणी असे अनोखे आंदोलन नुकतेच करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना मौजे दापोलीच्या वतीने मौजेदापोली येथील रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे तयार झालेल्या चिखलात लावणी केली. मौजे दापोली ग्रामपंचायत ते खेर्डी फाटा हा रस्ता बऱ्याच वर्षांपासून खराब झाला असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, गेल्यावर्षी या रस्त्यावरील खड्यांमुळे अपघातही झाला होता. ह्या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष अल्पेश भुवड हे दरवर्षी संबंधित खात्याला निवेदन देतात त्यानंतर इथे वरच्यावर फक्त काही दिवस टिकणारी डागडुजी केली जाते. त्यामुळे यावर्षी लावणी करून अनोखे आंदोलन केले गेले. मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनानंतर आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.