प्रतिनिधी/ दापोली
जिल्हय़ांतर्गत प्रवासी सेवेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी आगार व्यवस्थापनाच्या समन्वयाच्या अभावामुळे दापोली बसस्थानकातून एकही गाडी रवाना झाली नव्हती. मात्र शनिवारी दापोली बसस्थानकातून नियमांचे पालन करत रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड मार्गावर 9 फेऱया मार्गस्थ झाल्या.
शुक्रवारी सकाळी जिल्हांतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी काही प्रवासी बसस्थानकात आल्यानंतर त्यांना आरोग्य प्रमाणपत्र, आधारकार्ड, सॅनिटायझर, मास्क आणण्याच्या सूचना एसटी प्रशासनाकडून करण्यात आल्या. तसेच प्रशासनाला चालक व वाहकांचीही आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याने पहिल्या दिवशी दापोली आगाराचा मुहूर्त हुकला. मात्र दुसऱया दिवशी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करत व आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करत प्रवाशांना बसमध्ये सोडण्यात आले. शनिवारी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरी, 8 वाजता खेड, 8.30 वाजता मंडणगड व 10 वाजता चिपळूण मार्गावर बसेस मार्गस्थ झाल्या. दिवसभरात खेडसाठी चार, रत्नागिरीसाठी तीन, मंडणगड व चिपळूणसाठी प्रत्येकी 1 अशा 9 फेऱया सोडण्यात आल्या. मात्र फेऱयांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
पुन्हा ओघ वाढेल
गाडय़ांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसला तरी सर्व फेऱया नियमितपणे सोडण्यात येणार आहेत. भविष्यात पूर्वीसारखा प्रवाशांचा ओघ सुरू होईल, असा विश्वास आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांनी व्यक्त केला.