दापोली/ प्रतिनिधी
जिल्हांतर्गत प्रवासी सेवेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी समन्वयाच्या अभावामुळे दापोली बस स्थानकातून एकही गाडी रवाना झाली नव्हती. मात्र यावर मात करत शनिवारी दापोली बस स्थानकातून नियमांचे पालन करत अनेक नियमित गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या.
शुक्रवारी सकाळी जिल्हांतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आली. या नंतर काही प्रवासी एसटी स्थानकात जमा झाले होते. मात्र सकाळी तिथे आल्यानंतर त्यांना आरोग्यचे प्रमाणपत्र, सॅनीटायझर, मास्क आणि आधारकार्ड आणण्याच्या सूचना एसटीकडून देण्यात आल्या. तसेच प्रशासनाला एसटीचे चालक व वाहक यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आले. यामुळे पहिल्या दिवशी योजना बारगळली. मात्र दुसर्या दिवशी यावर प्रशासनाने मात केली प्रवास यांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे प्रवाशांना सांगितले. आणि आरोग्याचे प्रमाणपत्र स्वतः जवळच ठेवावे असे त्यांना सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवाशाचे आधार कार्ड पाहून प्रवासी इथला स्थानिकच आहे की मुंबईसारख्या शहरातून प्रवास करून आलेला आहे. याची पडताळणी करून प्रत्येकाला एसटीमध्ये सोडण्यात आले.
शनिवारी सकाळी साडेसात वाजता रत्नागिरी, आठ वाजता खेड, साडेआठ वाजता मंडणगड, दहा वाजता चिपळून तसेच खेड करिता चार फेऱ्या सोडण्यात आल्या. रत्नागिरी करिता तीन, मंडणगड व चिपळून करिता एक अशा फेऱ्या दापोली आगारातून मार्गस्थ झाल्या. मात्र यांना प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला. या गाड्या नियमित फेऱ्या म्हणून संबोधल्या जातील अशी माहिती आगार व्यवस्थापक वनकुद्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच भविष्यामध्ये प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढेल असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.