नवी दिल्ली : प्रतिनिधी
जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ला ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने आज सन्मानित करण्यात आले. येथील विज्ञान भवनात आज तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी 11 श्रेणीत 57 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्याहस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वरित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रकम प्रदान करण्यात आलेली आहे.
उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिह्यातील दापोली नगर पंचायतला दुसऱया क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगर पंचायत अध्यक्षा ममता बिपीन मोरे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्निल महाकाळ यांनी स्वीकारला.
दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्जीवन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगर पंचायत टँकरमुक्त झाले असल्याची प्रतिक्रिया ममता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर दिली.