प्रतिनिधी/ दापोली
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शुक्रवारी तिसऱया ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील दापोली नगर पंचायतीने देशात व्दितीय क्रमांक पटकावला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण 4 पुरस्कार जाहीर झाले आहेत.
जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱया व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तीना 11 श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे.
दापोली नगर पंचायत, सुर्डी ग्रामपंचायत पुरस्कारांच्या मानकरी
सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये देशातील सर्वोत्कृष्ट 3 संस्थांची निवड करण्यात आली असून यात रत्नागिरी जिल्हय़ातील दापोली नगर पंचायतीला दुसऱया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीत पश्चिम विभागातून निवड झालेल्या 3 ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हय़ाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी देशातून तीन गैर शासकीय संस्थांची निवड करण्यात आली आहे. या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱया क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
जनतेत जलजागृतीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱया देशातील एक वृत्तपत्र व एका वृत्तवाहिनीचीही सर्वोत्कृष्ट माध्यम श्रेणीत निवड करण्यात आली आहे. पुरस्कार स्वरूप रोख रक्कम, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येतील.