महाराष्ट्रातील लक्षवेधी पोलीस स्टेशन
प्रतिनिधी / दापोली
दापोली पोलीस स्टेशन येथे दापोली पोलीस ठाणे आणि निवेदिता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त उपक्रमातून साकार झालेले कायद्याचे म्युझियम आणि कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती या प्रकल्पाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश तडवी दापोली पोलीस स्थानकाचे सर्व कर्मचारी, दापोली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, दक्षता समितीच्या सदस्य डॉ. विद्या दिवाण, संपदा पारकर आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, संचालिका अस्मिता परांजपे त्याचप्रमाणे ॲड. नूतन परांजपे, सुरेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. तसेच या प्रकल्पात ज्यांनी मॉडेल म्हणून काम केलं त्यांच्यापैकी इयत्ता तिसरीतील गार्गी केळकर आणि इयत्ता सातवीतील स्नेहल भाटकर तसेच संदीप भाटकर, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष महेंद्र जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकल्पाबाबत बोलताना प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत परांजपे त्यांनी सांगितले , दापोली पोलीस स्थानक हे महाराष्ट्रातील पहिले पोलीस ठाणे आहे ज्या ठिकाणी स्वच्छतेच्या संदर्भातील संदेश आणि कायद्याच्या संदर्भातील बोलक म्युझियम आहे.
नजरचुकीने अथवा माहितीच्या अभावामुळे किंवा जाणीवेनेही अनेक चुकीच्या गोष्टी समाजात घडत असतात , त्या गोष्टी प्रत्यक्षात समोर दिसल्यानंतर आपण भानावर येऊ शकतो, या भावनेतून या ठिकाणी उभारलेल्या वणवा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना हेल्मेट गाडी चालवताना होणारे अपघात, अल्पवयीन विद्यार्थ्यांनी गाडी न चालवणे, ट्रिपल सीट गाडी न चालवणे, त्याचप्रमाणे पोक्सो कायदा काय आहे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं घातक आहे, अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात तसेच समानता दर्शवणारे प्रतीकात्मक फलक आणि प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
दापोली तालुका हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे अनेक पर्यटक येत असतात त्यांना स्वच्छता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे बाबत आणि पोलीस स्टेशनही पाहण्यासारखं एखादं ठिकाण असू शकतं अशी वेगळी ओळख मिळावी त्याचप्रमाणे नागरिकांना समाजभान राखण्यासाठी या म्युझियमचा निश्चितच उपयोग होईल.
पोलीस स्थानकात महाविद्यालयीन विद्यार्थी रोज पाणी पिण्याचे निमित्ताने येत असतात आणि त्यांच्या मनावरही चांगले संस्कार प्रतिबिंबीत व्हावेत अशा अनेक बाबींचा विचार करून स्वच्छते बाबतीत जनजागृती करण्याकरिता प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या पासून सौंदर्य निर्मिती आणि कायद्याच्या म्युझियमचे निर्मिती करण्यात आली आहे असे देखील परांजपे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रकल्पाचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहित कुमार गर्ग यांनी कौतुक केले.