लोकांनी अधिकाऱयांना विचारला जाब, त्वरीत समस्या सोडवण्याची मागणी
प्रतिनिधी /वास्को
आसय डोंगरी दाबोळी भागातील नागरिकांना पाणी पुरवठय़ाची समस्या सतावत असून या भागातील काही नागरिकांनी बुधवारी सकाळी वास्को बायणातील पाणी पुरवठा कार्यालयात येऊन आपली गाऱहाणी मांडली. पाण्याची समस्या त्वरीत सोडवण्यात यावी अशी जोरदार मागणी या नागरिकांनी केली.
आसय डोंगरी भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेल्या वर्षभरापासून पाणी पुरवठय़ाची समस्या भेडसावत आहे. ही समस्या सुटेल म्हणून या लोकांनी बरेच महिने वाट पाहिली. समस्या सुटत नसल्याने पाणी पुरवठा विभागाकडे या समस्येचा पाठपुरावाही केला. मात्र, समस्या तशीच असून तांत्रीक अडचणींमुळे आसय डोंगरी भागातील लोकांनी ही समस्या सहन करावी लागत आहे. या समस्येवर त्वरीत तोडगा काढावा अशी या नागरिकांनी केली आहे. या भागात सुरळीत पाणी पुरवठय़ाची समस्या हल्ली अधिक गंभीर बनलेली आहे. काही वेळा मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी पुरवठा होतो. हा पाणी पुरवठासुध्दा अगदी कमी दाबाने होतो. आणि पाणी पुरवठा जास्त वेळ राहात नाही. त्यामुळे बहुतेक लोकांना पाणी मिळतच नाही. पाण्याच्या प्रतिक्षेत लोकांच्या कामाधंदय़ांची आबाळ होत आहे. काही लोकांना कधीच पाणी मिळत नाही अशाही तक्रारी या लोकांनी मांडलेल्या आहेत. काही लोकांना कुपनलीकेचे पाणी दूरवरून आणावे लागते. पिण्यासाठी पाणी बाहेरून विकत आणावे लागते. टँकरव्दारेही पाणी पुरवठा होत नाही. पाण्याच्या काळजीमुळे रात्रीही जागाव्या लागतात. पाण्यासाठी लोकांना बरेच कष्ट सोसावे लागत असल्याच्या या लोकांच्या तक्रारी आहेत. पाणी का मिळत नाही याचा दोष शोधून काढण्यासाठी स्थानिक लोकांनी पैसाही खर्च केलेला आहे. मात्र, फायदा झालेला नाही. पाणी मिळत नसले तरी हजारो रूपयांची पाण्याची बिले मात्र नियमीत येत असल्याचे या लोकांचे म्हणणे आहे. पाणी मिळत नसतांना ही बिले कसली असा प्रश्न या लोकांनी केला आहे.
बुधवारी सकाळी या भागातील बऱयाच नागरिकांनी पाणी पुरवठा कार्यालयात येऊन उपस्थित अधिकाऱयांना या समस्येविषयी जाब विचारला. ही समस्या त्वरीत सोडवण्याची मागणी त्यांनी केली. या समस्येवर कायम तोडगा काढण्याचे प्रयत्न जारी असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून मिळाली.