प्रतिनिधी/ वास्को
दाबोळी विमानतळावरून गोवा ते लंडन अशी थेट हवाई सेवा रविवारपासून प्रारंभ करण्यात आली आहे. ही सेवा एअर बबल कराराअंतर्गंत एअर इंडियाने सुरू केलेली असून आता आठवडय़ातून दोन वेळा गोवा ते लंडन व लंडन ते गोवा असा थेट हवाई प्रवास करणे हवाई प्रवशांना शक्य होणार आहे.
कोविडच्या संसर्गामुळे मागच्या मार्च महिन्यापासून पूर्णपणे थंडावलेली दाबोळी विमानतळावरील हवाई सेवा आता हळुहळु वेग घेऊ लागलेली आहे. येत्या नोव्हेंबर अखेरपर्यंत दाबोळी विमानतळावरील हवाई सेवेत पन्नास टक्क्यांहून अधिक सुधारणा झालेली दिसेल असा विश्वास दाबोळीचे विमानतळ संचालक गगन मलीक यांनी व्यक्त केला आहे. पूर्णपणे ठप्प झालेली देशांतर्गंत प्रवासी हवाई वाहतुक वेग घेत असतानाच दाबोळी विमानतळ व खास करून गोव्यासाठी एक खास आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी सेवा एअर बबल करारांतर्गंत उपलब्ध झालेली आहे. गोवा ते लंडन व लंडन ते गोवा अशी ही थेट हवाई सेवा असून तीचा प्रारंभ रविवारी दाबोळी विमानतळावरून झाला. ही सेवा एअर इंडियाने उपलब्ध केलेली असून उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रमही रविवारी एअर इंडियाने घडवून आणला. पूर्वी दाबोळी विमानतळावरून गोवा ते लंडन थेट हवाई सेवा नव्हती. दिल्लीत ही सेवा थांबा घेत असे. तीथे हवाई जहाज बदलावे लागत असे. एअर इंडियाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या प्रवासातील अडचण दूर झालेली आहे. सध्या ऑक्टोबरमध्ये आठवडय़ातून एकच वेळा ही हवाई सेवा उपलब्ध असेल तर पुढील महिन्यापासून शुक्रवार व रविवार असे दोन दिवस ही सेवा उपलब्ध होईल अशी माहिती विमानतळ संचालक गगन मलीक यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना दिली. रविवारी पाहिल्याच फेरीत गोव्यातून 224 हवाई प्रवासी थेट लंडनकडे रवाना झाले.
दाबोळी विमातळावरील हवाई वाहतुक सेवेत वाढ
पूर्णपणे कोलमडलेली दाबोळी विमातळावरील हवाई वाहतुक हळुहळु वाढू लागली आहे. देशांतर्गंत हवाई सेवांची संख्या वाढू लागलेली आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत मार्चपूर्वीच्या तुलनेत दाबोळीतील हवाई सेवेत पन्नास टक्क्याहून अधिक सुधारणा झालेली दिसेल असा विश्वास विमानतळ संचालक गगन मलीक यांनी व्यक्त केला आहे. रविवारी 29 विमानांनी दाबोळी विमानतळावरून उड्डाण केले. येत्या 25 पासून हिवाळी हंगाम सुरू होणार आहे. या काळात इंडिगो, विस्तारा, एअर एशिया यांनीही आपल्या हवाई सेवेत वाढ केलेली आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबईबरोबरच चेन्नई, लखनौ, नागपूर व हैद्राबाद अशा नव्या शहरांकडेही दाबोळीवरून उड्डाणे होणार आहेत. गोव्यातील पर्यटन खुले झालेले आहे. यासंबंधीही आता जागृती होऊ लागलेली असून हळुहळु लोक गोव्याकडे वळु लागतील असे गगन मलीक म्हणाले.