वार्ताहर/ दाभोळ
गुहागर तालुक्यातील दाभोळ परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने अनेक घरे, बागा, झाडांची विल्हेवाट लावली. मात्र यात जीवितहानी टळल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. मात्र यामुळे लाखो रूपयांची वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या वादळाने अनेक घरांच्या पत्र्याच्या शेड उडून गेल्या. अनेक बागांमधील आंबा, माड, पोफळी, कोकम, फणस आदी झाडे भुईसपाट झाली. भाजीचे मळे उद्ध्वस्त झाले. समुद्राची, खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मासेमारी बोटीबरोबरच किनारपट्टीलगत असणाऱया घरांनाही त्याचा मोठा फटका बसला. गावामध्ये ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले, तारा तुटल्याने संपूर्ण दाभोळ परिसरातील वीज प्रवाह खंडित झाला आहे. तसेच रस्त्यावर झाडे, जाहिरात व मार्गदर्शक फलक पडल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प होती. मात्र ग्रामस्थांनी दुपारी वादळ शमल्यानंतर लगेचच वाहतुकीस अडथळा असणारी झाडे तोडून मार्ग मोकळा केला. दरम्यान, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत.