बाजारपेठांमधून जीवनावश्यक वस्तू गायब झाल्याने जनतेचे हाल : खासगी गोदाम-घाऊक विक्रेत्यांच्या मालाची तपासणीचे आदेश
प्रतिनिधी/ पणजी
एका बाजूने राज्यात लॉकडाऊन चालू आहे. तर दुसऱया बाजूने राज्यातील बाजारपेठांमधून जीवनावश्यक वस्तू गायब झाल्या आहेत. त्यामुळे जनतेचे अक्षरशः हाल होत आहेत. राज्यातील दुकाने बंद असून जीवनावश्यक शीधा सामुग्री मिळवण्यासाठी नागरिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. या परिस्थितीचा लाभ उठवत काही दुकानांमध्ये दामदुपटीने वस्तूंची विक्री होत असूनही याकडे सरकारचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
जनतेच्या मूलभूत गरजांकडे राज्य
सरकारचे साफ दुर्लक्ष झाले आहे. नागरीपुरवठा खातेही निद्रिस्त बनलेले आहे.
सत्ताधारी गटातील बहुतांश आमदार गायब झाले आहेत. ज्या सरपंच व
नगराध्यक्षांनी जनतेच्या मदतनिधीसाठी विडा उचललेला आहे त्यांना
नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. राज्यातील परिस्थिती प्रचंड
बिघडलेली आहे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फक्त दोन महिन्याला पुरेल
एवढे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असल्याचा दावा करीत
आहेत.
बहुतांश दुकांनांमधून साखर गायब
राज्यातील बहुतांश दुकांनांमधून साखर गायब झाली आहे. कित्येकांकडे तांदूळ पोतीच नाहीशी झालेली आहेत. अवघ्या काही दुकानांमध्ये तांदूळ व साखर उपलब्ध करून दुपटीने त्यांची विक्री होत आहे. राज्याच्या सामाजिक वितरण क्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णतः सुटलेले आहे व जनतेला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
राज्यातील बहुतांश बाजारपेठा बंद आहेत. मात्र सहकार क्षेत्रातील संस्थांनी आपापली आस्थापने खुली केली आहेत. गोवा बागायतदार सह. सोसायटीने आपल्या सर्व शाखा खुल्या करून जीवनावश्यक वस्तूंची विक्री सुरू केली. गोवा मार्केटिंग फेडरेशनने आपली विक्री केंद्रे सुरू केली. बार्देश बाजारनेही आपले विक्री केंद्र सुरू केले. या संस्थांमध्ये जेवढा माल शिल्लक आहे त्याची विक्री त्यांनी सुरू केली. मात्र बाजारातून तांदूळ, गहू, साखर, इत्यादी आवश्यक वस्तू गायब झाल्या आहेत. ज्या खासगी दुकानांमध्ये थोडाफार माल आहे. त्याची प्रचंड दराने विक्री केली जात आहे. नागरिकांनी विविध प्रकारच्या सोशल मीडियाद्वारे सरकारचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतल्यानंतर जनतेच्या डोळय़ात धूळफेक करण्यासाठी नागरीपुरवठा खात्याने काही अधिकाऱयांची नियुक्ती करून राज्यातील खासगी गोदामे तसेच घाऊक विक्रेत्यांच्या मालाची तपासणी करण्याचे आदेश जारी केला.
पीठ गिरण्या त्वरित सुरू करा : मुख्यमंत्री
दरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील दुकानांमधून आटा गायब झाल्याच्या पार्श्वभूमीवर गिरणीवाल्यांना त्वरित पिठाच्या गिरणी सुरू करा असे आदेश दिलेले आहेत. आम्ही गिरण बंद करा असे कधी सांगितलेले नव्हते. तथापि आता आजपासून तरी त्वरित पीठगिरण्या सुरू करा असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
…आणि कारापूर सरपंच सावंत झाल्या भावूक !
आपली व्यथा दै. तरूण भारतकडे मांडताना कारापूरच्या सरपंच सुषमा सावंत यांना अक्षरशः रडू कोसळले. त्या भावूक बनल्या. त्यांनी सर्व नेत्यांच्या दारात जाऊन कारापूर सर्वण पंचायत क्षेत्रातील जनतेसाठी अक्षरशः भीक मागितली. कोणीही प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे फोन आपण घेते. त्यांना मदत करणार तर आसपासच्या भागातील दुकानदारांकडे माल नाही. गोदामे रिकामी आहेत. नागरिक जीवनावश्यक खाद्यान्नाची मागणी करताहेत. स्थानिक आमदाराला फोन केल्यानंतर आणखी दोन दिवस वाट पहा असे सांगतात. मी काय करू ! एका बाजूने सांखळी दुसऱया बाजूने डिचोली नगरपालिका. दोन्ही ठिकाणी बाजारपेठा. परंतु तेथील व्यापारी इथे खाद्यान्न देऊ शकत नाहीत व त्यांच्याकडील खाद्यान्नाचा साठा संपला. आमचे नाव जाहीर केल्यानंतर जनता आमच्या मागे लागते. जनता अशी तडफडत राहिलेली आम्हाला पाहवत नाही असे निवेदन करून सरपंच सुषमा सावंतना अक्षरशः रडू कोसळले.