मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी /मडगाव
एखाद्या युवकाने आपल्या परिस्थितीवर खितपत राहण्यापेक्षा त्यावर आपण कसे मात करणार हे जर शिकायचे असले तर ते नक्कीच दामू नाईक यांच्याकडून शिकावे. दामू नाईक हे खऱया अर्थाने आपल्या परिस्थितीवर संघर्ष करणाऱया युवकांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
दामू नाईक यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सौ. दिक्षा दामू नाईक, मनोहर बोरकर, तुळशीदास नाईक, पुर्णानंद च्यारी तसेच इतरांची उपस्थिती होती.
दामू नाईक यांच्यासाठी पुढील दिवस हे ‘नक्कीच अच्छे दिन’ असतील असे सांगून मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, दामू नाईक व आपली ओळख ही 1999 सालापासूनची. दामू नाईक हे आमदार होण्याअगोदर व आमदार झाल्यानंतरही ओळख आहेच. खास करून दामू नाईक हे युवा मोर्चाचे राज्य अध्यक्ष होते, तेव्हा आपण सांखळी मतदारसंघात युवा मोर्चाचे काम करीत होतो. गोव्यात युवा मोर्चाच्या कार्याला खरी उभारी मिळाली ती दामू नाईक यांच्या नेतृत्वाखालीच. केवळ फातोडर्य़ातच नव्हे तर संपूर्ण गोव्यात त्यांनी युवा मोर्चाचे कार्य नेले. त्याची नोंद राष्ट्रीय युवा मोर्चावर देखील घेतली गेली.
विरोधी आमदार म्हणून विधानसभेत दामू नाईक यांची भाषणे ही प्रभावी होती. सत्तेत असताना काम करणे व लोकांमध्ये जाणे सुलभ असते. मात्र, विरोधात काम करणे व लोकांमध्ये जाणे तेव्हढेच महत्वाचे असते आणि दामू नाईक यांनी हा समतोल साधला होता. 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली केलेले कार्य सातत्याने लोकांच्या आठवणीत आहेत.
दामू नाईक यांना नेहमीच जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. तसाच पाठिंबा आगामी काळात मिळेल तसेच फातोडर्य़ात भाजपचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दामू नाईक यांच्या रूपाने भाजपला 1999 मध्ये हिरा सापडला आणि याच काळात गोव्याला चांगले राजकारण देण्याचे काम सुरू झाले व त्यात दामू नाईक यांचा देखील मोठा सहभाग होता असे उद्गार केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
राजकारण हे समाजाचे भले करण्याचे साधन म्हणूनच भारतीय जनता पार्टी या राजकारणात उतरली. आम्ही हाडाचे राजकारणी नव्हे, परंतु, गोव्यातील जे काही होईल ते चांगले असेल या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू झाले. जीवनातील वाईट परिस्थितीवर मात कशी करावी हे दामू नाईक यांच्याकडून सर्वांनीच शिकण्यासारखे आहे. आजच्या युवा पिढीचे ते आदर्श असल्याचे केंद्रीयमंत्री श्री. नाईक म्हणाले.
दामू नाईक हे भाजपचे सामान्य कार्यकर्ते, आज ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचा सामान्य कार्यकर्ता असून देखील ते आमदार झाले. दामू नाईक व आपण बरोबर आमदार झालो, त्यावेळी भाजपमध्ये बरेच आमदार हे सामान्य कुटुंबातील होते असे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले. दामू दोन वेळा आमदार झाले, मात्र, त्यांच्यात अहंकार निर्माण झाला नाही. सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच ते वागले. एखाद्या विषयावर बोलायचे झाल्यास त्यावर पूर्ण अभ्यासकरूनच दामू नाईक बोलतात व यासाठी त्यांचा कुणीच हात धरू शकत नाही.
पक्षाशी गद्दारी नाहीच
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दामू नाईक म्हणाले की, आमदार असताना भाजप सोडण्यासाठी आपल्याला दोन-तीन वेळा ऑफर देण्यात आल्या. पैशांच्या बॅगापुढे करण्यात आल्या. पण, आपण भाजपशी प्रामाणिक राहिलो व या पुढे देखील पक्षाशी प्रामाणिक राहणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
जीवनात अनेक गोष्टीकडे संघर्ष केला. राजकारणात सुद्धा बऱयाचवेळी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी कोण पाठीत खंजीर खुपसणार हे सांगता येत नाही. मात्र, त्यावर जास्त चिंता करीत न बसता, आपले कार्य पुढे नेण्यावर भर दिला असून फातोडर्य़ाच्या जनतेच्या पाठिंब्यावर आपण नक्कीच पुढील वाटचाल करीत राहणार असल्याचे दामू नाईक म्हणाले.