ऑनलाईन टीम / लखनऊ :
भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले दारा सिंह चौहान यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.
यावेळी बोलताना दारसिंग म्हणाले, अभिमन्यूला रोखण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे महारथ बसविण्यात आले, तसेच अखिलेश यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, अखिलेश यातून निसटून बाहेर पडले आहेत. सातवे द्वार तोडून ते विजय प्राप्त करतील. भाजप हा मागासांच्या हक्कांना मारत आहे. आरक्षण रद्द केले जात आहे. मागास समाजातील मुलांचे आरक्षण काढून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा भाजपचा कट आहे. मागास समाज आता जागा झाला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सपा सरकार स्थापन होईल आणि अखिलेश यादव पुन्हा मुख्यमंत्री होतील.
अखिलेश यादव म्हणाले, आरक्षण रद्द करून राज्यघटना कमकुवत करण्यासाठी भाजप खासगीकरणाच्या धोरणावर काम करत आहे, हे दलित आणि मागास समुदायांना समजले आहे. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी सपाच्या व्हर्च्युअल रॅलीदरम्यान स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह भाजपच्या आठ बंडखोर आमदारांनी सपामध्ये प्रवेश केला आहे.