ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारताने सन 2005-06 ते 2015-16 या दहा वर्षाच्या काळात देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी मोठी कामगिरी केली. त्यामुळे देशातील 27 कोटी 30 लाख लोक दारिद्रयरेषेच्या बाहेर आले आहेत. दारिद्र्य निर्मूलनाची ही आकडेवारी जगात सर्वाधिक आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांची यूएनडीपी संस्था आणि ऑक्स्फर्ड पॉवर्टी ऍन्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या संस्थांनी 75 देशांचा अभ्यास केला. त्यामध्ये 65 देशांमधील गरिबीची परिस्थिती सुधारली.त्यात भारताची ही कामगिरी सरस ठरली आहे.
भारताने 10 वर्षाच्या या कालखंडात उपेक्षित वर्गाला आरोग्य, शिक्षण, यासारख्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या कामाची खालावलेली स्थिती, जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. या काळात भारतातील तब्बल 27 कोटी 30 लाख लोक गरिबी रेषेच्या बाहेर येऊ शकले, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
भारताबरोबरच नॉर्थ मॅकेडोनिया, आर्मेनिया, निकारागुआ या देशांनीही दारिद्र्य निर्मूलनासाठी मोठे काम केले आहे. जगातील 107 विकसनशील देशांमधील 1.3 अब्ज व्यक्ती अद्यापही दारिद्रयरेषेखालील जीवन जगत असल्याचे या अहवाल स्पष्ट झाले आहे.