सत्तरीतील सालेली गावातील महिला दारूमुक्तीसाठी पुढे सरसावलेल्या आहेत. या गावामधील बेकायदा दारूविक्री विरोधात या रणरागिणींनी दंड थोपटले आहेत. या लढय़ाला कितपत यश येते, हे पहावे लागेल.
गोवा राज्यात कोरोनाची महामारी काही हटलेली नाही. राज्यात सगळीकडे रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्येत जराशी घट झाली असली तरी बळींच्या संख्येत चढ-उतार होत आहेत. आता गोमंतकीय तेवढय़ा प्रमाणात कोरोनाची धास्ती बाळगताना दिसत नाही. तसेच पर्यटकांचेही गोव्यात बऱयाच प्रमाणात आगमन झाले असून तेही मास्कविना बिनधास्त फिरताना आढळतात. असा शांतताप्रिय गोवा मात्र विविध आंदोलने, मोर्चांनी धुमसत आहे. सामाजिक अंतर न पाळता विविध मागण्यांसाठी एकत्रित येताना आढळतो. आपल्या मागण्या पदरात पाडण्यासाठी कोरोनाची तमा न बाळगता संघर्ष करण्यासाठी जमाव पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सत्तरीतील सालेली गावातील महिला भगिनी दारूमुक्तीसाठी पुढे सरसावलेल्या आहेत. या गावामधील बेकायदा दारूविक्री विरोधात या रणरागिणींनी दंड थोपटले आहेत. या लढय़ाला कितपत यश येते, हे पहावे लागेल.
उघडय़ावर, सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करणे हे आता गोव्यात केवळ पर्यटकांकडूनच नव्हे तर स्थानिकांकडूनही नित्याचेच झाले आहे. गोव्यातील विविध पठारावर म्हणा किंवा पर्यटन स्थळांवर गटागटाने दारू पिणे हेही प्रकार घडत असतात. ती एक फॅशनच बनली आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. त्यामुळे पर्यावरणावरही परिणाम होतो. मद्यपी तर्र।़ होऊन त्यांच्यात भांडणे होत असतात. त्याचे पर्यावसान खुनातही होण्याची शक्यता असते. उघडय़ावर दारू पिण्यावर कडकपणे निर्बंध आणणे आवश्यक आहे.
एकेकाळी ज्याप्रमाणे गोवा आणि खाण असे समीकरण होते, त्याप्रमाणे गोवा म्हणजेच दारू अशी प्रतिमा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. अशा या गोव्यात सत्तरी तालुक्यातील सुर्ला गावाचा आदर्श बाळगून याच तालुक्यातील सालेली गावातील नागरिक व विशेषतः महिला पुढे सरसावल्या आहेत. दारूबंदीसाठी त्यांनी दंड थोपटले आहेत हे निश्चितच स्वागतार्ह आहे. येत्या काळात याचा कित्ता इतर गावेही गिरवून दारूबंदीचा नारा लावतील, ही अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. हे करीत असताना सध्या अस्तित्वात असलेल्या बारमालकांना पर्यायी व्यवसायासाठी उद्युक्त करणे गोमंतकीय जनतेबरोबरच गोवा सरकारचे कर्तव्य ठरते.
आज गोव्यात हॉटेलांची संख्या कमी अन् दारूच्या दुकानांची संख्या वाढत आहे. एकवेळ चहाचे दुकान सापडणे कठीण मात्र दारूच्या दुकानांची संख्या वाढतच चालली आहे. पावलो-पावली ती सापडतात. गोव्यातील मंदिरांपेक्षाही मद्यालयांची संख्या सर्वाधिक आहे, ही वस्तुस्थिती आहे. ही संख्या वाढण्यामागे कारणे काय, ती शोधून काढणे गरजेचे आहे. प्रसिद्ध गोमंतकीय कवी बा. भ. बोरकर यांनी सुंदर गोव्याचे चित्र कवितेमधून रेखाटताना ‘माझ्या गोव्याच्या भूमीत गडय़ा नारळ मधाचे, कडय़ा-कपारींमधून घट फुटती दुधाचे’ असे म्हटले होते. आता बोरकर यांची क्षमा मागून, आज गोव्यात कडय़ा-कपारींमधून घट फुटती मद्याचे, असे खेदाने म्हणावे लागेल. ‘मजेक सोरो व पिकांसावांकय सोरो’ (आनंद साजरा करण्यासाठी दारू व पश्चातापासाठीही दारू) सेवन करणे, ही आता गोमंतकीय संस्कृती बनत चालली आहे व त्याची री।़ पर्यटकही ओढत आहेत, ही धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर सुर्ला पाठोपाठ सालेली येथील महिला भगिनींनी दारूबंदीसाठी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. गोव्यातील इतर जागरूक नागरिकांनीही त्यांना यासाठी पाठिंबा देणे कर्तव्य ठरते व आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी त्यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.
सुर्ला गावाने दारूबंदीसाठी दोन वर्षांपूर्वी एकजुटीचे दर्शन घडविले होते. गोव्याच्या दृष्टीने खऱया अर्थाने हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. दारूमुळे बदनाम असलेल्या गोव्यातील काही गावांमध्ये यापूर्वी दारूची दुकाने बंद पाडण्याचे धाडस त्या त्या गावातील ग्रामस्थांनी केले आहे. यात आश्चर्य मानू नये. सत्तरीतील हिवरेवासियांनीही काही वर्षांपूर्वी दारूबंदीसाठी एकजूट दाखविली होती. या गावात दारू दुकाने बंद केल्यामुळे गावातील समस्या आपोआपच सुटल्या, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावात आतापर्यंत शांतता असल्याचे, ते सांगतात. हिवरे गावात यापूर्वी दारूच्या दुकानांमुळे लहान सहान मुद्दय़ांवरून भांडण तंटे व्हायचे. विकासाला खीळ बसली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीच्या बळावर गावातील दारू दुकाने बंद पाडून गावातील विकासाचा मार्ग मोकळा केला. दारूबंदी करून गावात एक सुंदर मंदिर उभारले. व्यसनमुक्तीसारखी शिबिरेही राबविली. खरोखरच या गावाने एक आदर्श निर्माण केला आहे. पर्यटनाच्या नावाखाली दारूप्राशन करून गावात होणारा हैदोस रोखण्यासाठी सालेली येथील ग्रामस्थांनी दारू दुकानांविरोधात केलेल्या बंडाची सरकारने गंभीर दखल घेऊन या भागात खास अबकारी खात्याचे पथक नेमले आहे. दारू व्यवसाय हा कित्येकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. गंगाजळी मिळण्याचे ते एक साधन आहे, याबद्दल दुमत नाही परंतु या व्यवसायामुळे आजची युवा पिढी बिघडत तर चालली नाही ना अशी खंत, भीती वाटत आहे.
गोवा म्हणजे फक्त मद्यालयेच, अशी जी प्रतिमा देश, विदेशात आहे, ती बदलण्याच्यादृष्टीने सुर्ला पाठोपाठ सालेली येथील महिला-भगिनीनी दारूबंदीसाठी उचललेली पावले, केलेले धाडस निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या आंदोलनाला यश लाभू दे, अशी शुभेच्छा देणे क्रमप्राप्त आहे. ‘व्यसनमुक्त, सुंदर गोवा, सुजलाम् सुफलाम् गोवा’ बनविण्याचे स्वप्न भविष्यकाळात साकार व्हावे, हीच अपेक्षा !
राजेश परब