राज्यात आठ दिवसांत 20 जणांनी संपविले जीवन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात मद्यविक्रीवरही राज्य सरकारने बंदी घातली आहे. दारू मिळत नाही म्हणून अनेक जण आपले जीवन संपवत आहेत. अनगोळ येथील एका युवकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारू मिळत नाही म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवून त्याने गळफास घेतला आहे.
बुधवारी सकाळी 8 वाजता आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला आहे. देवेंद्रप्पा निलकंठाप्पा हडपद (वय 42) असे त्याचे नाव आहे. भेंडीगिरी चाळ अनगोळ येथील आपण राहत असलेल्या खोलीत देवेंद्रप्पाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.
टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्रप्पा हा अनगोळ येथील एका हेअरकटींग सलूनमध्ये काम करीत होता. तो मूळचा सौंदत्ती येथील राहणारा होता. भेंडीगिरी चाळ येथे तो भाडय़ाच्या खोलीत राहत होता.
लॉकडाऊनमुळे गेल्या आठ दिवसांपासून दुकान बंद आहे. त्यामुळे तो खोलीतच राहत होता. त्याचा नाष्टा, जेवण सलून मालकाकडे होत होते. वॉईनशॉप बंद झाल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासूनच तो आपल्या मालकाला कोठून तरी दारू मिळवून द्या, असा तगादा लावला होता. आता सर्व काही बंद आहे, कोठेही दारू मिळत नाही. जेवणखान करीत व्यवस्थित तुझ्या खोलीत रहा, असा सल्ला सलून मालकाने त्याला दिला होता.
दारू न मिळाल्याने त्याची अस्वस्थतता वाढली होती. मंगळवारी मध्यरात्रीनंतर त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. बुधवारी सकाळी त्याला नाष्टय़ासाठी सलून मालक उठविण्यासाठी गेले होते. दरवाजा ठोठावूनही आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्याने चारओळीची चिठ्ठी लिहून ठेवली असून दारू मिळत नाही म्हणून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.
राज्यात 20 जणांनी संपविले जीवन
गेल्या आठवडय़ाभरात दारू मिळत नाही म्हणून संपूर्ण राज्यात सुमारे 20 जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. एका उडुपी जिल्हय़ात 7 जणांनी आपले जीवन संपविले आहे. तर बळ्ळारीत अबकारी खात्याच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून अधिकाऱयांनी जप्त केलेली 44 हजारांची दारू चोरण्यात आल्याची घटना घडली आहे.