ऑनलाइन टीम / पुणे :
हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घालून बसलेल्या चिमुकल्यांवर बोरं, चॉकलेट, गोळ्यांचा वर्षाव करुन तरुणाईसोबत दिग्गजांनी वंचित मुलांसोबत बोरन्हाण साजरे केले. सामाजिक जाणीवेचे भान राखत समाजातील वंचित विशेष मुलांनादेखील सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, याकरीता मकरसंक्रातीनिमित्त या आगळ्यावेगळ्या वंचितांच्या बोरन्हाणाचे आयोजन करण्यात आले होते.
मैत्र-युवा फाऊंडेशनतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन शाळेमध्ये झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.न.म.जोशी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती श्री.ग.बापट, सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, सुप्रिया देशमुख, डॉ.सचिन वानखेडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, सेवासदन दिलासा केंद्राच्या संगिता नागपुरकर, मेघना जोशी, सहेली संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, शेखर पानसरे आदी उपस्थित होते. देहविक्रीय करणा-या महिलांच्या मुलांसाठी काम करणा-या सहेली संस्थेतील मुले, नूतन समर्थ विद्यालयातील वंचित मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. डॉ.न.म.जोशी यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, निसर्गाने आपल्याला दिलेल्या गोष्टी इतरांना देणे म्हणजेच देण्याची लूट आपण बोरन्हाणातून करीत असतो. तरुणाई अशा कार्यक्रमांमध्ये मोठया प्रमाणात सहभागी झाल्याने संस्कृतीचा संकेत निर्माण होत असल्याचे चांगले चित्र उभे राहिले आहे. श्री.ग.बापट म्हणाले, सामाजिक जाणिवा दृढ करण्याचे काम यामाध्यमातून होत आहे. नदी, वायू, ध्वनी प्रदूषण आपण थांबवू शकतो. परंतु मनाचे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.