ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. संक्रमितांच्या आकड्यांबरोबरच कोरोनाबळींचाही आकडा वाढत आहे. असे असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील 180 जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
गेल्या 14 दिवसांत 18 जिल्ह्यांमध्ये तसेच 21 दिवसांत 54 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याचेही हर्ष वर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना वैद्यकीय मदत पाठविली जात आहे
भारत सरकारने म्हटले आहे की, परदेशातून आलेली आवश्यक वैद्यकीय मदत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे. आतापर्यंत 2933 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, 2529 ऑक्सिजन सिलिंडर, 13 ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प, 2951 व्हेंटिलेटर्स राज्यांना देण्यात आली आहेत. बीआय पीएपी / एपी कॅपच्या वायल्स आणि तीन लाखाहून अधिक रेमडेसिवीर वितरित केले गेले आहेत.