देशात 24 तासात 51 हजार रुग्णांची ‘कोरोना’वर मात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी सतत वाढत असतानाच रविवारी बरे होणाऱयांचे प्रमाण वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. देशात रविवारपर्यंतच्या मागील 24 तासात सर्वाधिक 51 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 54 हजार 736 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 50 हजार 723 इतकी झाली आहे. सध्या 5 लाख 67 हजार 730 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 37 हजार 364 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी एका दिवसात सर्वाधिक 853 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बळींची संख्या वाढल्याने देशात मृत्यूचे प्रमाणही 3.16 टक्के इतके झाले आहे.
रिकव्हरी रेट 65.44 टक्क्यांवर
गेल्या पाच दिवसांपासून देशात रोज 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात रविवारपर्यंत 11 लाख 45 हजार 629 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.44 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, ‘आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार देशात 1 ऑगस्टपर्यंत 1 कोटी 98 लाख 21 हजार 831 इतक्मया कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी 4 लाख 63 हजार 172 चाचण्या या शनिवार 1 ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत.
देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारी 9,601 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 हजार बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान 322 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15 हजार 316 वर गेली आहे.
लसीच्या चाचणीचा मार्ग मोकळा
भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.
अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. नुकताच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
अभिषेक बच्चननेही ट्विटरवरून अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज मिळाल्याचे जाहीर केले. मात्र अभिषेक अद्याप रूग्णालयात दाखल असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट केले की, माझ्या वडिलांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या ते घरी असून आराम करत आहेत.
तर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर म्हटले आहे, माझी कोरोना चाचणी निगेटीव्ह आली असून मला डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या मी घरीच क्वारंटाईन आहे. आई, वडिलांचे आशीर्वाद, नातेवाईक, मित्र आणि चाहत्यांच्या प्रार्थनेमुळे मी बरा झालो आहे. असे सांगत त्यांनी नानावटी रूग्णालयाचेही आभार मानले. अमिताभ बच्चन यांना 11 जुलै रोजी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.