मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आरोपाची मालिका सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने केंद्रात असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. ‘दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे?’, असा सवाल काँग्रेस पक्षाने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र काँग्रेस या अधिकृत ट्विट्र हँडलवरून ट्वीट करत म्हटले आहे की, ऑक्सीजन तुटवड्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला असता ‘ते बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत’ असं उत्तर देण्यात येतं, रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना पुरवठा करू नका सांगितलं जातं. दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?, असा खडा सवाल काँग्रेसने भाजपला विचारला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आणि संजय धोत्रे यांच्यावर महाराष्ट्राची बदनामी करत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. एक फोटो ट्विट केला असून, त्यावर दिल्लीची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे हे केंद्र सरकारमधील महाराष्ट्रद्रोही मंत्री महाराष्ट्राच्या काय कामाचे?, असे काँग्रेसने म्हटले आहे.
राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता काँग्रेसने देखील या वादात उडी घेतली आहे. भाजप याला कसे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.