वीजमंत्री नीलेश काब्राल यांचा दावा
प्रतिनिधी / पणजी
वीज दराच्या विषयावरून ‘आप’चे नेते वाल्मिकी नाईक व वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्यात वाद-विवाद झाला. परंतु तो फारसा रंगला नाही. त्यातून शेवटी काहीच निष्पन्न झाले नाही. नाईक यांनी दिल्लीचे सरकार 200 युनिटपर्यंत मोफत वीज देते, असा दावा केला तर काब्राल यांनी तो दावा खोडून काढताना दिल्लीपेक्षा कमी दराने गोव्यात वीजपुरवली जाते, असे म्हणणे मांडले. मर्यादित वेळेमुळे हा वादविवाद लवकर संपवण्यात आला. दोघांनी एकमेकांना आव्हाने दिल्यामुळे हा उपक्रम करण्यात आला. प्रमोद आचार्य यांनी सूत्रसंचालन केले.
दोघांनी दिल्ली तसेच गोव्यातील काही वीज बिले सादर केली आणि त्यांची फोड करून सांगितली. गोव्यात असेच दिल्ली येथे त्या बिलांची रक्कम किती झाली असती आणि ती रक्कम कशी कमी जादा आहे यावर दोघांनी उहापोह केला. दोघांनी आपलेच म्हणणे खरे असल्याचे सांगितले.
वादविवाद करता करता दोघेही इतर योजनांवर पोहोचले आणि मूळ विषय बाजूलाच राहिला. गोवा दिल्लीची लोकसंख्या आणि दोन्ही राज्यांचे एकूण अर्थसंकल्प येथे विषय पोहोचला. वीज क्षेत्रात अनेक प्रकल्प साधनसुविधांचे नियोजन असल्याची माहिती काब्राल यांनी दिली. तथापि गेल्या 8 वर्षात ते प्रकल्प का साकार झाले नाहीत, अशी विचारणा करून नाईक यांनी त्याची कारणे सांगण्याची मागणी केली. वीजदर सोडून दोघेजण भलत्याच विषयाकडे वाहत गेले. शेवटी आचार्य यांनी दोघांना सावरत हा वादविवाद संपुष्टात आणला. तेथे फक्त पत्रकार व प्रसार माध्यमांना अनुमती होती. तथापि हा उपक्रम ऑनलाईन असल्याने अनेक लोकांनी थेट पाहिला. दिल्लीचे प्रतियुनिट वीज दर हे गोव्यातील वीज दरापेक्षा जास्त असल्याचे काब्राल यांनी निदर्शनास आणले.