ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील कृषी भवन सील करण्यात आले आहे. कृषीभवनातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कृषीभवनाचा एक भाग दोन दिवसांसाठी सील करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मत्स्य, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर 21 मे पर्यंत हे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या दोन दिवसात पूर्ण कार्यालय सैनिटाइझ केले जाणार आहे. तसेच कोरोना बाधित सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून पाच दिवसांनी सर्वांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील त्यांनाच काम सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
दरम्यान, सध्या देशात चिंताजनक स्थिती निर्माण झाली असून कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर पोहचली आहे, तर आता पर्यंत 3 हजार 156 लोकांनी आपला जीव गमावला आहे.