मुख्यमंत्री केजरीवालांचे आश्वासन : विकसित देशांच्या धर्तीवर व्यवस्था
नवी दिल्ली
आप सरकार दिल्लीमध्ये जलपुरवठा व्यवस्थेला विकसित देशांच्या धर्तीवर विकसित करणार आहे. उत्तम जलव्यवस्थापनासाठी एक सल्लागार नियुक्त केला जाणार असून शहरात पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी म्हटले आहे. सरकार आगामी 5 वर्षांमध्ये 24 तास पाणीपुरवठा निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
राष्ट्रीय राजधानीत जलपुरवठय़ाचे खाजगीकरण केले जात असल्याचा आरोप केजरीवालांनी फेटाळला आहे. जलपुरवठय़ाचे खासगीकरण होऊच शकत नाही. विकसित देशांच्या राजधानींमध्ये पूर्णवेळ पाणी उपलब्ध असते आणि तेथे सबमर्सिबल पंपची गरज भासत नाही. दिल्लीतही हे आम्ही शक्य करुन दाखवू. शहरातील जलपुरवठा विकसित देशांप्रमाणेच उत्तम राहणार असल्याचे आश्वासन केजरीवालांनी दिले आहे.
दिल्लीत मोठय़ा प्रमाणावर पाणी वाया जाते. दिल्ली जल मंडळ शहरात दररोज 93 कोटी गॅलन पाणी उपलब्ध करते. म्हणजेच प्रतिव्यक्ती 176 लिटर पाणी उपलब्ध करण्यात येते, यातील पाण्याची चोरी किंवा गळती होते. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी उत्तरदायित्त्व निश्चित केले जावे आणि ते वाया जाण्यापासून रोखले जावे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
जलपुरवठा व्यवस्थापनात सुधारणा सुचण्यासाठी आम्ही एक सल्लागार नियुक्त करणार आहोत. पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये यासाठी तो मदत करणार आहे. पूर्णवेळ जलपुरवठा करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केली आहेत. सल्लागार एससीएडीए प्रणाली समवेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती पुरविणार आहे. याच्या मदतीने केंद्रीय नियंत्रण कक्षातून जलपुरवठय़ाचे व्यवस्थापन केले जाऊ शकते. दिल्लीत जलपुरवठा वाढविण्याच्या दिशेनेही काम सुरू आहे. उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अन्य राज्यांशी चर्चा केली जात असल्याची माहिती केजरीवालांनी दिली आहे.