मुख्यमंत्री केजरीवालांचा दावा : केस पॉझिटिव्हिटी रेट घटतोय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळू लागले आहे. पुढील काळात लोकांनी सावधगिरी न बाळगल्यास पुन्हा स्थिती बिघडू शकते, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी म्हटले आहे. ज्या भयावह स्थितीचा अनुमान व्यक्त केला जात होता, तशी स्थिती आता निश्चितच नाही. चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुलनेत कमी झाले आहे. दिल्लीत बाधित बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
30 जूनपर्यंत दिल्लीत 1 लाख रुग्ण असतील अशी भीती होती, परंतु आता अशी स्थिती नाही. दिल्लीत सध्या 87 हजार बाधित सापडले असून यातील 58 हजार जणांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. 1 जूनपर्यंत 60 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असतील अशी भीती होती, जी खोटी ठरल्याचे उद्गार केजरीवालांनी काढले आहेत.
नवे रुग्ण कमी होत आहेत
राजधानीत नव्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. याचदरम्यान बरे होणाऱयांचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच दिल्लीत लोकांना संसर्ग होत असला तरीही ते यातून बरे होत आहेत. याचाच अर्थ मृत्यूदर नियंत्रणात आणण्यास यश मिळाल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
बळींचे प्रमाण घटले
दिल्लीत कोरोनामुळे होणाऱया दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण घटू लागले आहे. एका दिवसात यापूर्वी 125 बाधित मृत्युमुखी पडले होते, परंतु आता दैनंदिन बळींचे प्रमाण 60 म्हणजेच निम्म्यावर आल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली आहे.
चाचण्यांवर भर
केंद्राच्या सहकार्याने राज्य सरकारने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. पूर्वी 100 जणांची चाचणी झाल्यास 31 कोरोनाबाधित आढळून येत होते, परंतु आता 100 चाचण्यांमागे 13 रुग्ण सापडत असल्याचे ते म्हणाले.
खबरदारी कायम ठेवा
सद्यकाळात सर्वकाही खुले करू शकत नाही. रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे प्रयत्नांमध्ये घट होता कामा नये. समाजमाध्यमांवर दिल्लीत कोरोनाचा पीक (टोकाची पातळी) येऊन गेल्याचे काही कथित तज्ञ सांगत आहेत. अशाप्रकारच्या तज्ञांवर लक्ष देऊ नका, मुखपट्टा परिधान करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.