केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील विधानसभा निवडणूक नजीक आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपने काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीत अलिकडेच झालेल्या हिंसक घटनांमध्ये आप आणि काँग्रेसचा हात होता. दोन्ही पक्षांनी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप जावडेकरांनी केला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जामिया, सीलमपूर आणि दरियागंजमध्ये झालेल्या हिंसाचाराचा जावडेकर यांनी उल्लेख केला आहे. आप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांना चिथावणी दिल्याने हिंसाचार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीलमपूरचे काँग्रेस नेते चौधरी मतीन, आप नेते इशराक खान, अब्दुल रहमान, जामियाचे अमानतुल्लाह हे हिंसाचारात सहभागी होते, असे त्यांनी म्हटले आहे.
अमानतुल्लाह खानवर आरोप
आप आमदार अमानतुल्लाह खान यांनी प्रक्षोभक भाषणे केली. अजानवर बंदी येईल, बुरख्यावर बंदी येईल अशा अफवा त्यांनी पसरविल्याचा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे.
शांत शहरात हिंसाचार
काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांनी मिळून लोकांच्या मनात कायद्यासंबंधी संशय निर्माण केला आहे. यातून दोन्ही पक्षांनी दिल्लीसारख्या शांत शहरात हिंसाचार घडवून आणल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा कुणाचेच नागरिकत्व हिरावू शकत नाही, हा केवळ नागरिकत्व प्रदान करणारा कायदा असल्याचे ते म्हणाले.
शेय घेण्यास आप आघाडीवर
आम आदमी पक्ष दुसऱयाच्या कामाचेही शेय घेण्यास आघाडीवर आहे. दिल्लीतील महापालिकेने उत्तम काम केल्याने डेंग्यूने लोकांचा बळी गेला नाही, तर ईस्टर्न पेरिफेरल वेद्वारे ट्रक शहराबाहेरून जात असल्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. आप सरकारने महामार्गाच्या खर्चातील स्वतःच्या हिस्स्यातील रक्कम अद्याप दिलेली नाही. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्यातील फाईल आप सरकारने रोखून ठेवल्याचा आरोप जावडेकर यांनी केला आहे.