ध्रुवीकरण होण्याची शक्यता : भाजप-आप यांच्यात मुख्य लढत असल्याची अप्रत्यक्ष कबुली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील विधानसभा निवडणुकीत खातंही न उघडू शकणाऱया काँग्रेससमोर पुन्हा सुमार कामगिरीचा धोका आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी एक वगळता सर्व मतदारसंघांमध्ये भाजप आणि आम आदमी पक्षाच्या संघर्षात काँग्रेस कुठेच नसल्याचे पक्षाचे नेते खासगीत मान्य करत आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी निदर्शनांचे उघड समर्थन करणाऱया काँग्रेसला मुस्लीम मतदारांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा होती. पण भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यातील तीव्र वाप्युद्धाच्या स्थितीत नुकसान होण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. काही काळापूर्वी 6 जागांवर यश मिळण्याची अपेक्षा होती. पण आता काँग्रेसचा उत्साह ओसरला आहे. शाहीन बागमधील निदर्शने आणि भाजपच्या राजकीय प्रचारामुळे दिल्लीतील चित्र पालटले आहे. ध्रुवीकरणामुळे दिल्लीतील निवडणूक आता दोन पक्षांपुरती मर्यादित राहिल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
दिग्गज नेते प्रचारापासून दूर
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना प्रचारमोहिमेत उतरविण्यात आले नसल्याची कबुली पक्ष देत आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका वड्रा यांनी प्रचारात सहभाग घेतलेला नाही. काँग्रेस पक्ष फारतर 5 किंवा 6 मतदारसंघांमध्ये गांभीर्याने निवडणूक लढवत आहे. ओखला, बल्लीरामन, सीलमपूर आणि मुस्तफाबाद या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व दिसून येत असून तेथे मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार आहेत. गांधीनगर आणि बादली येथे उमेदवार चुरस निर्माण करत असल्याचे काँग्रेसचे मानणे आहे.