वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरेनाच्या दुसऱया लाटेचा सामना करणाऱया दिल्लीत आता स्थिती बरीच सुधारली असून ती नियंत्रणात येत आहे, असा दावा दिल्ली सरकारने केला आहे. 7 नोव्हेंबरपासून राज्यात कोरोना मृत्यूदरात घट झाली असून ही समाधानाची बाब आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र नारायण जैन यांनी दिली.
चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून रूग्णसंख्या चाचण्यांच्या प्रमाणात कमी होत आहे. 7 नोव्हेंबरपूर्वी हे प्रमाण 15.8 टक्के होते. याचा अर्थ असा की जितक्या चाचण्या केल्या गेल्या त्यांच्या 15.8 टक्के लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत होते. तथापि, आता हे प्रमाण 12 टक्क्यांवर आले असून मृत्यूदरातही घट झाली आहे. सध्या दिल्लीतील मृत्यूदर 2 टक्के असल्याचे सांगितले जात आहे. तो आणखी कमी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे सत्येंद्र नारायण जैन यांनी पत्रकारांशी संवादात सांगितले.
शुक्रवारी दिल्लीत 12 हजारांहून अधिक रूग्ण आढळले होते. महाराष्ट्रातही ही संख्या 5 हजारांहून अधिक होती. सध्या दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळ या तीन राज्यांमध्ये नवे रूग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सध्या आली असून ती अधिक तीव्र असल्याचे सांगण्यात येते. हरियाणा. पंजाब व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हिंवाळय़ात शेतातील गवत जाळण्यात येते. यामुळे दिल्लीत प्रचंड प्रमाणात प्रदूषणवाढ होते. परिणामी, कोरानाच्या प्रसाराला अनुकूल वातावरण तयार होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.