ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत सुरू असलेल्या सीसीए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाने अधिकच हिंसक वळण घेतले आहे. दिल्लीतील मौजपूर व गोकुलपुरी भागात आज तिसऱया दिवशीही दगडफेक व निदर्शने सुरु आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकाऱयांसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर जाऊन प्रार्थना केली.
केजरीवाल म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून राजधनी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देश काळजीत आहे. या हिंसाचारामध्ये लोकांचे बळी गेले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. जर हा हिंसाचार वाढला तर त्याचा परिणाम हा प्रत्येकावर होणार आहे. यामुळे गांधीजींच्या अंहिसेच्या मार्गावर चालण्यातच सर्वांच हित आहे. म्हणून शांतता निर्माण होण्यासाठी आम्ही येथे प्रार्थना करत आहोत.
दरम्यान, राजघाटावर अहिंसेचा संदेश देणाऱया गांधींजींना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पोहोचले. इथे शहरातील हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरु आहेत. या नागरिकांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.