झपाटय़ाने होणारे काँक्रिटीकरण, शहरातील वृक्षांची बेसुमार तोड इत्यादी कारणांमुळे कावळे आणि चिमण्या गायब होत आहेत. पूर्वीच्या काळी मुलांची बालपणे याच पक्ष्यांच्या गोष्टी ऐकत काऊ-चिऊचे घास घेत आणि त्यांच्या सानिध्यात जात असत. पण आता कावळे-चिमण्यांचे नुसते दर्शन होणेही अशक्मयप्राय झाले आहे. आणखी काही वर्षांनी हे पक्षी नामशेष होतील, अशी चिंता व्यक्त होत आहे. तसे होऊ नये म्हणून दिल्लीत एक चिमणीघर उदयाला येत आहे. ते भारतातील सर्वात मोठे असेल, असे सांगितले जात आहे.
विविध प्रकारच्या हजारो चिमण्यांना या घरात आश्रय, संरक्षण आणि पुनरुत्पादनाची संधी दिली जाणार आहे. त्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यांना घरटी बांधण्यासाठी सोयीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. त्यांना येथे कृत्रिम घरांमध्ये ठेवण्यात येणार नाही. तसे झाल्यास घरटे बांधण्याची कला हे पक्षी विसरू शकतात, याचीही काळजी घेण्यात येत आहे. घरटी बांधण्यासाठी लागणारी नैसर्गिक साधने म्हणजेच गवताच्या काडय़ा किंवा झाडांच्या साली आणि पाने इत्यादी सामग्री उपलब्ध होणार आहे. नंतर या चिमण्या आणि कावळे शहरांमध्ये झाडे असणाऱया ठिकाणी सोडून देण्यात येणार आहेत. पर्यावरणाचा समतोल पुन्हा निर्माण करण्यासाठी हा प्रयोग काही अंशी तरी उपयोगी पडेल, अशी प्रशासनाची अटकळ आहे.
भारतात किमान 70 प्रकारच्या चिमण्या आढळतात. कावळय़ांचेही अनेक प्रकार आहेत. यातील अनेक प्रकार सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा कावळे-चिमण्यांच्या प्रजातीला जीवनदान देण्यासाठी हा प्रयोग होत आहे.