वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशने दिल्लीचा 46 धावांनी पराभव करून विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. उत्तर प्रदेशचा शतकवीर उपेंद्र यादवला सामनावीर पुरस्कार मिळाला.
उत्तर प्रदेशने 50 षटकांत 7 बाद 280 अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. उपेंद्र यादवने 101 चेंडूत 11 चौकार, 2 षटकारांसह 112, करण शर्माने 100 चेंडूत 83 धावांचे योगदान दिले. याशिवाय समीर चौधरीने 35 चेंडूत नाबाद 43 धावा फटकावल्या. दिल्लीच्या प्रदीप सांगवान, सिमरनजित सिंग यांनी प्रत्येकी 2 तर कुलवंत खेजरोलिया, ललित यादव यांनी एकेक बळी मिळविला. त्यानंतर दिल्लीचा डाव 48.1 षटकांत 234 धावांत गुंडाळून उत्तर प्रदेशने विजयासह उपांत्य फेरीही निश्चित केली. दिल्लीच्या ललित यादवने 61, अनुज रावतने 47, हिम्मत सिंगने 39, प्रदीप सांगवानने 26 धावा केल्या. उत्तर प्रदेशच्या यश दयालने 53 धावांत 3, अक्षदीप नाथ व अकिब खान यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.