कोणीही भीती बाळगू नये : जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
दिल्ली येथील तबलिक जमातच्या निजामुद्दीन मरकजमध्ये बेळगावातीलही दहा जणांनी हजेरी लावली होती. हे सर्वजण बेळगावात परतले असून या दहा जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे. या प्रकरणावरून कोणीही भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्ली येथील झालेल्या या कार्यक्रमात देशातील मुस्लीम बांधवांसह अन्य 15 देशांतील बांधव सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उपस्थितांपैकी काहींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव भागातील 10 जण या मरकजमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीस गेले होते. काही दिवसांपूर्वी ते सर्वजण बेळगावात परतले आहेत. यामुळे बऱयाच शंका उपस्थित होत आहेत. मात्र दिल्लीहून परतलेल्या या सर्व 10 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यात कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्वॅब बेंगळूर येथील प्रयोगशाळेत पाठवून देण्यात येणार आहेत, असे जिल्हा आरोग्य सर्व्हलन्स अधिकारी डॉ. तुक्कार यांनी कळविले आहे.
बेळगावातील दहाजण दिल्ली येथून परतल्याची माहिती दोन आठवडय़ांपूर्वीच जिल्हा प्रशासनास मिळाली होती. तेव्हापासून त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे या दहा जणांविषयी कोणीही भीती बाळगू नये, असे आवाहन डॉ. तुक्कार यांनी केले आहे.