वृत्तसंस्था/ अबुधाबी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सध्या गुणतक्त्यात आघाडीवर असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ शनिवारी येथे होणाऱया केकेआर†िवरुद्धच्या सामन्यात भक्कम फलंदाजीवर लक्ष देत आपले अव्वल स्थान कायम राखण्याचा प्रयत्न करेल. हा सामना शनिवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.
सध्या दिल्ली संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन हा चांगल्याच फॉर्ममध्ये असून त्याच्याकडून पुन्हा शनिवारच्या सामन्यात आक्रमक आणि आकर्षक फलंदाजीची अपेक्षा बाळगली जात आहे. धवनने या स्पर्धेत आतापर्यंत आपल्या नावावर दोन शतके झळकवली आहेत. पण शनिवारच्या सामन्यात केकेआरचा संघ तितकाच तुल्यबळ असल्याने दिल्ली संघाला केवळ धवनची मोठी खेळी विजयासाठी पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे सांघिक फलंदाजी करण्यासाठी या संघाचे प्रयत्न राहतील. नवोदित पृथ्वी शॉ फलंदाजीचा सूर मिळवण्यासाठी झगडत आहे. गेल्या चार सामन्यात शॉ ला दोन वेळा खातेही उघडता आले नव्हते. कर्णधार अय्यर हा अद्याप पूर्ण तंदुरुस्त झालेला दिसत नाही. त्याला पूर्वीसारखी आक्रमक फटकेबाजी दुखापतीमुळे जमत नसावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऋषभ पंतच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष राहील. अय्यर शनिवारच्या सामन्यात खेळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्याच्या दुखापतीत सुधारणा झाली असल्याने या महत्त्वाच्या सामन्यात तो संघाचे पुन्हा नेतृत्व करणार आहे. अय्यर, पंत, स्टोईनिस हे दिल्ली संघातील मध्यफळीतील फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज रबाडा आणि नॉर्त्जे हे दिल्ली संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत. पंजाब विरुद्धच्या यापूर्वीच्या सामन्यात रबाडाला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या स्पर्धेच्या पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी आता पुन्हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नव्याने चुरस सुरू झाली आहे.
कोलकाता संघाची फलंदाजी भक्कम होणे जरुरीचे आहे. शुभमन गिल, कर्णधार मॉर्गन यांच्याकडून आतापर्यंत म्हणावी तशी मोठी खेळी झालेली नाही. यष्टीरक्षक दिनेश कार्तिक फलंदाजीत अपयशी ठरत आहे. विंडीजचा अष्टपैलू सुनील नरेन हा कोलकाता संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो. शनिवारच्या सामन्यात विंडीजच्या आंदे रसेलला संधी दिली जाणार असून गेल्या सामन्यात दुखापतीमुळे तो खेळू शकला नव्हता. कर्णधार मॉर्गन, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा यांच्याकडून चांगली कामगिरी होणे आवश्यक आहे. शनिवारच्या सामन्यात विजयासाठी कोलकाता संघाला सांघिक कामगिरीची आवश्यकता जरुरीची आहे.