ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आयपीएल 2021 मधून दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने ब्रेक घेतला आहे. अश्विनचे कुटुंब सध्या कोरोना विरुद्ध लढा देत आहे आणि आपल्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. काल (रविवारी) अश्विन सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात खेळायला उतरला, परंतु त्यानंतर त्याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, या हंगामात तो आणखी खेळणार नाही.
अश्विनने ट्विट करत म्हटले कि, मी उद्यापासून आयपीएलच्या या मोसमात ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब कोरोना विरुद्ध युद्ध लढा देत आहे आणि मला या कठीण काळात त्यांच्या बरोबर राहायचे आहे. जर गोष्टी सुधारल्या तर मी परत येईन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स!. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आला, ज्यात सुपर ओव्हर झाली आणि दिल्ली कॅपिटल्सने सामना जिंकला.
दरम्यान, अश्विनच्या या ट्विटनंतर दिल्ली कॅपिटल्सने देखील एक ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले आहेत की, या कठीण काळात आमचे पूर्ण समर्थन तुला आहे आश्विन. दिल्ली कॅपिटल्स आपल्याला आणि आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आधार आणि प्रार्थना पाठवत आहे. दरम्यान, आश्विन याने कटुंबातील कोणत्या सदस्याला कोरोना झाला आहे याबाबत माहिती दिली नाही परंतु कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य कोरोनाशी लढा देत आहे.
अश्विनने आयपीएल 2021 या मोसमात दिल्ली कॅपिटल्स या टीमकडून 5 मॅचेसमध्ये 7 रन आणि 1 विकेट घेतली आहे.