विमानतळ संचालकांची मंत्रालयाकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन नंतरच्या काळातही बेळगाव विमानतळाने मोठी गरूड झेप घेतली. त्यामुळे प्रवाशांची संख्या दररोज वाढत असून बेळगावमधून दिल्ली, चेन्नई, मंगळूर या तीन शहरांना विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने याकडे लक्ष देऊन या सेवा सुरू कराव्या अशी मागणी बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा उपाध्ये यांच्याकडे व्हीडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे केली.
रविवारी देशातील काही निवडक विमानतळाच्या संचालकांची उपाध्ये यांनी व्हीडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे मिटींग घेतली. यावेळी मौर्य यांनी बेळगावच्या प्रवाशांचा आवाज मंत्रालयाच्या अधिकाऱयांपर्यंत पोहोचविला.
बेळगावमधील अनेकजण नोकरी व व्यवसायानिमित्त चेन्नई येथे जातात. मराठा लाईट इंन्फंट्री तसेच एअरमन टेनिंग स्कूल बेळगावमध्ये असल्याने दिल्लीला प्रवास करणाऱया जवानांची संख्या अधिक आहे. मंगळूर येथे नामवंत कॉलेजमध्ये बेळगावमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नेहमी ये-जा असते. या तिन्ही शहरांना बेळगावमधून विमान सेवा सुरू करण्यासाठी सोशल मिडीयामधून अभियान देखील राबविण्यात येत आहे. त्यामुळे या शहरांना विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मौर्य यांनी केले.
यावेळी बोलताना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सह सचिव उषा उपाध्ये म्हणाल्या या संदर्भात आपण वेगळी बैठक घेऊ. त्यावेळी या विषयाची सविस्तर चर्चा करता येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या तीन शहरांना विमान सेवा सुरू करायची असेल तर नागरिकांनीच इच्छा व्यक्त करणे गरजेचे आहे.