प्रतिनिधी / वास्को
दिल्ली ते गोव्यापर्यंत सुरू करण्यात येत असलेल्या प्रवासी रेल सेवेला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी विरोध दर्शवला आहे. ही सेवा रद्द करण्यात यावी. अन्यथा गोवा संकटात सापडणार असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे. ही सेवा कुणाच्या फायदय़ासाठी आणि या सेवेचा हेतू काय हे सरकारनेच स्पष्ट करावे असेही त्यांनी म्हटले आहे.
कोरोना संकटाने देशभर भिती निर्माण केलेली आहे. सुदैवाने आपला गोवा सुरक्षीत आहे. गोवा हरीत क्षेत्र म्हणून जाहीर झालेले आहे. मात्र, सरकार ज्या पध्दतीने निर्णय घेत आहे, ते पाहिल्यास गोव्याच्या जनतेबाबत भिती वाटत असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे. दिल्ली ते गोवा अशी प्रवासी रेल्वे सेवा आठवडय़ातून दोन वेळा येत्या दि. 15 पासून सुटणार आहे. मात्र, गोव्यासाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे. ही सेवा कुणासाठी आहे. त्यात गोवेकर किती लोक असणार आहेत असा प्रश्न उपस्थित करून सरकारने या रेल्वेमधून चारशे गोवेकर गोव्यात येणार असल्याचे जे विधान केले आहे, ते गोवेकर याचेही स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे. ही सेवा गोवेकरांसाठीच असल्यास त्यांच्यासाठी तीन बोगीही पुरेशा आहेत. पूर्ण रेलगाडीची आवश्यकता नाही. ही रेल्वे रत्नागीरी, पनवेल, वरूडा, कोटा अशा स्थानकांवर थांबून गोव्यात येणार असून त्यातील तीन स्थानकांचा लाल क्षेत्रात समावेश आहे. कोरोनाचा कहर झालेल्या क्षेत्रातून येणारी ही रेल्वे गोव्यात कोरोना घेऊन येण्याचा धोका आहे.
राज्य सरकारने परराज्यातील लोकांना गोव्यात प्रवेश करू दिला जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, हेच सरकार बाहेरील लोकांना गोव्यात आमंत्रण देऊ लागलेले असून यामागे सरकारचा छुपा अजेंडा असावा अशी शंका आमोणकर यांनी व्यक्त केली आहे. ही रेल्वेसेवा दिल्लीतील उद्योजक, प्रतिष्ठीत व्यक्ती, कॅसिनोवाले किंवा राजकीय लोकांच्या सोयीसाठी असावी. गोवा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षीत असल्याने या लोकांना आपल्या कुटुंबियासह गोव्यात यायचे आहे. त्यांच्यासाठीच हा प्रयत्न चालला असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला.
मुरगाव बंदरातून बॉक्साईट वाहतुकीलाही विरोध
कोरोनाच्या संकटात लोकांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न चाललेले असताना सरकारने कोरोनाच्या प्रसारासाठी खतपाणी घालणारे निर्णय घेणे सुरूच ठेवलेले आहे. मुरगाव बंदरातून बॉक्साईट खनिजाची वाहतुक करण्यासाठी बेळगावहून 900 ट्रक गोव्यात येण्याच्या मार्गावर असून हा धोकादायक प्रकार ठरणार आहे. या 900 ट्रकांबरोबर त्यांचे 2 हजार चालक असतील आणि त्यांचे वाहकही असतील. मुरगाव बंदरातील 89 हजार टन बॉक्साईट खनिज घेऊन हे ट्रक मुरगाव बंदरातून पुन्हा बेळगावच्याच एका कंपनीसाठी माघारी जाणार आहेत. या मालवाहतुकीचा गोवेकरांना किंवा गोव्याच्या सरकारला काडीचाही फायदा नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात या मालवाहतुकीची काहीही गरज नाही. या व्यवसायासाठी हजारो लोक बेळगावहून वास्कोत येणार आहेत. बेळगावात कोरोनाने कहर केलेला आहे. त्यामुळे गोव्यात भिती पसरलेली आहे. अशा परिस्थितीत त्यांना गोव्यात प्रवेश दिल्यास गोवा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे ही वाहतुक होऊ देऊ नये अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली आहे.