ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या सीबीएससी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशातील सर्व राज्यांनी आपल्या आपल्या राज्यातील परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता दिल्ली सरकारने आज इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.
सिसोदिया यांनी सांगितले की, दिल्लीतील 9 वी आणि 11 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ज्या खासगी शाळांनी मिड टर्म परीक्षा घेतली होती, त्या शाळांनी मिड टर्मच्या आधारे 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करू शकतील.
पुढे ते म्हणाले, ज्यांनी इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा पहिल्यांदाच स्थगित केल्या होत्या, त्या परीक्षा आता रद्द करण्यात आल्या आहेत. तर दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये 9 वी आणि 11 वी च्या परीक्षांचा निकाल 22 जून रोजी जारी करतील. हा निकाल विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. तसेच कोणत्याही शाळांना विद्यार्थ्यांना रिझल्ट घेण्यासाठी शाळते बोलावण्यास मनाई असेल, असेही मनीष सिसोदिया यांनी यावेळी स्पष्ट केले.