नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये एक आठवड्यांची वाढ करण्यात आली असून सध्याचे निर्बंध आता 31 मेपर्यंत कायम राहणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी याबाबतची घोषणा केली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे सांगितले.तसेच हा आलेख असाच उतरता राहिला तर आम्ही 31 मेपासून दिल्लीत टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यास सुरुवात करु, असे देखील केजरीवाल यांनी सांगितले.
यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीत काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचा दर 15 टक्क्यांपेक्षा जास्त होता. मात्र, आता हा दर 2.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या 24 तासांमध्ये दिल्लीत कोरोनाचे 1600 नवे रुग्ण सापडल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.दिल्लीतील सर्व लोकांना वेळेत लस मिळाली तर तिसरी लाट येणारच नाही, असे देखील अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले.
आम्ही दिल्लीतील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस देण्याची योजना आखत आहोत. त्यासाठी आम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय लस उत्पादक कंपन्यांच्या संपर्कात आहोत. लस खरेदीसाठी दिल्ली सरकार स्वत:कडील पैसे द्यायला तयार असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.