ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी सुधारणा कायद्यांविरोधात दिल्लीत मागील 17 दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आता ‘चक्का जाम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून आज दिल्ली-जयपूर व दिल्ली-आग्रा महामार्ग ठप्प करण्यात येणार आहे. शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दिल्ली-जयपूर व दिल्ली-आग्रा महामार्ग ठप्प करण्यासाठी पंजाबहून हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यात टोल प्लाझा जाम करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपा नेत्यांच्या घरांसमोरही आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठ्या कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे शेतकरी हतबल ठरेल. मोठ्या कंपन्यांचे हित साधण्याचा सरकारचा कुटील डाव आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याविरोधात दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.