योगेंद्र यादवांचाही समावेश :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली दंगलीच्या एका प्रकरणी पोलिसांच्या आरोपपत्रात माकप महासचिव सीताराम येचुरी, स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव, अर्थतज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद आणि माहितीपट निर्माते राहुल राय यांची नावे नमूद आहेत. हे सर्वजण आरोपी नाहीत, एका अन्य आरोपीने यांची नावे घेतल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
दिल्ली दंगलीचे आरापी देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि गुलफिशा फातिमा यांनी स्वतःच्या विधानात योगेंद्र यादव, जयती, अपूर्वानंद आणि राहुल राय यांचे नाव घेतले होते. जाफराबाद हिंसाचाराप्रकरणी ही विधाने नोंदवून घेण्यात आली होती. जाफराबाद येथूनच दंगलीला प्रारंभ झाला होता. या तिन्ही जणांवर अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
जमाव कटांतर्गत वाढू लागला होता. उमर खालिद, चंद्रशेखर उर्फ रावण, योगेंद्र यादव, सीताराम येचुरी आणि वकील महमूद प्राचा समवेत काही जण या जमावाला चिथावणी देण्यासाठी पोहोचले होते असा दावा फातिमाने केला आहे. निदर्शने करण्याचा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार असल्याचे प्राचा यांनी म्हटले होते. तर उर्वरित नेत्यांनी सीएए आणि एनआरसीला मुस्लिमविरोधी ठरवून समुदायातील असंतोषाला खतपाणी घातल्याचे तिन्ही आरोपींनी सांगितल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
येचुरींचा प्रतिआरोप
आरोपी ठरविल्याप्रकरणी येचुरी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. विखारी भाषणाच्या चित्रफिती असलेल्यांच्या विरोधात कारवाई का होत नाही? दिल्ली पोलीस भाजपच्या केंद्र सरकार अंतर्गत काम करते. पोलिसांची ही अवैध आणि बेकायदेशीर कारवाई भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा दृष्टीकोन दर्शविते. केंद्र सरकार विरोधकांचे प्रश्न आणि शांततापूर्ण निदर्शनांना घाबरते आणि सत्तेचा गैरवापर करून आम्हाला रोखू पाहत असल्याचा दावा येचुरी यांनी केला आहे.
हे चुकीचे : यादव
आरोप ठेवल्याचा दावा तथ्यात्मक दृष्टय़ा चुकीचा आहे. पुरवणी आरोपपत्रात मला कट रचणारा तसेच आरोपी ठरविण्यात आलेले नाही. एका आरोपीच्या विधानाच्या आधारावर माझा आणि येचुरींचा उल्लेख करण्यात आला असून तो न्यायालयात टिकणार नसल्याचा दावा योगेंद्र यादव यांनी ट्विट करत केला आहे.
दंगलीत 53 बळी
सीएए विरोधी निदर्शनांदरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये 24 फेब्रुवारी रोजी दंगल भडकली होती. या दंगलीत 53 जणांना जीव गमवावा लागला होता आणि 200 हून अधिक जण जखमी झाले होते. पोलिसांनी दिल्ली दंगलीप्रकरणी 751 एफआयआर नोंदविले आहेत.