मात्र 53 जणांचा मृत्यू 1562 नवीनरुग्ण
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनामुळे होणारी मृत्युंची संख्या वाढतच असून गेल्या 24 तासांत म्हणजे सोमवारी 53 जणांचे बळी गेले तर 4008 रुग्ण बरे झाले. दिवसभरात 1562 नवीन रुग्ण सापडले, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 25753 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीपासूनच्या एकूण बळींचा आकडा 2152 झाला आहे. 193 जणांना हॉस्पिटलमधून घरी पाठविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
काल सोमवारी कोरोनाची बाधा झाल्याने 189 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून ती संख्या प्रथमच घरी पाठविण्याऱया रुग्णसंख्येपेक्षा कमी झाली आहे. सुमारे 836 कोरोना रुग्णांना होम आयसोलेशन देण्यात आले असल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले.
कोरोनातून बरे होणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवीन संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी प्रतिदिनी मत्यू होणाऱयांची संख्या अजुनही 50 च्या पुढे जात असल्याचे समोर आले आहे. बळींचे सत्र कमी होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आतापर्यंत एकूण 137418 जणांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील 109513 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरानातून बरे होण्याचा दर वाढत असून तो 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा दर 37 टक्के आहे. काल दिवसभरात झालेल्या 53 बळींपैकी 23 जणांचे मृत्यू हे गोमेकॉत बांबोळी येथे झाले तर 27 जणांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्राण सोडला. फोंडा उपजिल्हा इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. एकाचे धारबांदोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात निधन झाले. तसेच दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात एकाचा प्राण गेला.
म्युकर म्युकॉसिसच्या 6 रुग्णांची नोंद : बांदेकर
गोव्यात म्युकर म्युकॉसिसच्या एकूण 6 रुग्णांची प्रकरणे नोंद झाल्याची माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली, त्या सर्व रुग्णांवर शिष्टाचारानुसार उपचार सुरू असून उच्च मधुमेह असणाऱया रुग्णांना त्यांची बाधा अधिक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोरोनाचे रुग्ण अजुनही उपचार घेण्यास उशीर करीत असून त्यामुळे पुढे आरोग्यात अधिक गुंतागुंत निर्माण होते. तो धोका टाळण्यासाठी वेळेवर तपासणी करणे उपचार घेणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
कोरोना रुग्ण प्रवेश प्रक्रिया ताब्यात : रवी धवन
आरोग्य सचिव रवी धवन यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी 21 खासगी हॉस्पिटल्स सरकारने ताब्यात घेतलेली नाहीत तर तेथे फक्त कोरोना रुग्णांची प्रवेश प्रक्रिया नीट होण्यासाठी सरकारने विशेष अधिकारी नेमले आहेत. तेवढीच प्रक्रिया ताब्यात घेतली आहेत. तेथे येणाऱया कोरोना रुग्णांना परत पाठविले जाऊ नये. त्यांच्याकडे आगाऊ रक्कम कोरोना उपचारासाठी मागण्यात येऊ नये. कोरोना रुग्णांनी ती देऊ नये याची दक्षता घेण्याचे काम ते अधिकारी करतील. कोरोना रुग्णांना दीनदयाळ स्वास्थ्य विमा योजनेतून मोफत उपचार मिळावेत म्हणून ती सोय करण्यात आल्याचे धवन यांना स्पष्ट केले.