15 तोळे सोने आणि चांदीचे दागिन्याची पिशवी घेवून चोरटे पसारः चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील माधवनगर येथील सागर ज्वेलर्समधून चोरट्यांनी 15 तोळ्यांचे सोने आणि चांदीचे दागिने असा जवळपास आठ ते साडेआठ लाखाचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत सागर ज्वेलर्सचे मालक दत्ताजी रघुनाथ साळुंखे रा. घनश्याम नगर, सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे दत्ताजी साळुंखे हे माधवनगर येथील आपले सागर ज्वेलर्स दुकान उघडले. घरातून 15 तोळ्यांच्या सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्याची बॅग त्यांनी आपल्या दुकानांतील काऊंटरच्या आतील बाजूस ठेवली होती. ते दुकानात साफसफाई करत होते. तितक्या दोन युवक त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी तुमचे पैसे दुकानाबाहेर पडले आहेत असे सांगितले त्यामुळे दत्ताजी साळुंखे ते पडलेले पैसे घेण्यासाठी दुकानाच्या बाहेर गेले असता तितक्यात या दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुकानात आतील बाजूस ठेवलेली सोने आणि चांदीच्या दागिन्याची पिशवी घेवून ते प्लसर दुचाकीवरून पळून गेले. ते युवक पळून का गेले हे साळुंखे पहात असताना त्यांना त्यांच्या दागिन्याची पिशवी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती पोलीसांना दिली. संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक उमेश चिकणे आणि त्यांच्यासह पोलीस ताफा त्याठिकाणी गेला आणि त्यांनी माहिती घेतली व या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले व चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.